ठाणे : हरवलेल्या आणि अपहरण झालेल्या शून्य ते १८ या वयोगटातील मुलांना पुन्हा मायेचे छात्र मिळावे, यासाठी राज्यात १ जुनपासून सुरू झालेल्या ‘आॅपरेशन मुस्कान महाराष्ट्र-२’ या मोहिमंतर्गत ठाणे शहर पोलिसांनी गेल्या सहा दिवसात सात गुन्हे उघडकीस आणले आहेत. यात आठ मुलांना स्वगृही पाठवल्याने या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर मुस्कान पसरली आहे. आॅपरेशन मुस्कान महाराष्ट्राप्रमाणे आॅपरेशन मुस्कान महाराष्ट्र-२ मध्ये जास्तीत जास्त हरवलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्याचा निर्धार शहर पोलिसांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या निर्देनानुसार, एप्रिल महिन्यात राबविलेल्या ‘आॅपरेशन मुस्कान महाराष्ट्र’ याला राबलेल्या मोहिमेला लाभलेल्या चांगल्या प्रतिसादामुळे ‘आॅपरेशन मुस्कान महाराष्ट्र -२’ ही मोहिम १ जुन ते ३० जुनदरम्यान हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत ठाणे शहर पोलीस आयुक्तालाच्या हद्दीत शहर पोलीस आयुक्त परमबीर सिंग, सह-पोलीस आयुक्त आशुतोष डुम्बरे, उपायुक्त(गुन्हे) पराग मणेरे, सहाय्यक पोलीस आयुक्त भरत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली चाईल्ड प्रोटेक्शन युनीटच्या पाच पथकांसह आयुक्तालयातील ३४ पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक पथक अशी ३९ पथके स्थापन केली आहेत. त्याद्वारे हरवलेल्या मुलांचा शोध घेताना या पथकांना चाईल्ड लाईन आणि सामाजिक संस्थांची मदत लाभणार आहे.एप्रिल महिन्यातील आॅपरेशन मुस्कान महाराष्ट्र मोहिमेतंर्गत शहर पोलिसांनी ७७ जणांना स्वगृही पाठवले. यात ३४ मुली आणि ३६ मुलांचा समावेश असून उर्वरित सात जण १८ वर्षावरील असल्याची माहिती युनिटचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश राणे यांनी दिली.
‘मुस्कान’अंतर्गत आठ मुले स्वगृही
By admin | Updated: June 9, 2016 04:18 IST