संशोधकांचा अभ्यास सुरू : नारळीकरांच्या ‘क्लास’ने विद्यार्थी ‘इन्स्पायर’ नागपूर : जगात ‘इबोला’ तसेच इतर काही नवीन पण भयंकर रोगांमुळे दहशत आहे. याबाबत वैद्यकशास्त्राप्रमाणेच खगोलशास्त्राच्या दृष्टीनेदेखील जगभरात अभ्यास सुरू आहे. अंतराळातून धुमकेतू किंवा अशनीच्या माध्यमातून या रोगांचे जीवाणू पृथ्वीवर आले का याबाबत संशोधकांनी अभ्यासाला सुरुवात केली आहे. सध्या ही केवळ शक्यता असली तर अभ्यासाअंती वेगळा निष्कर्ष बाहेर निघण्याची बाब नाकारता येत नाही, अशी माहिती ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर यांनी दिली. केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे प्रायोजित व शिवाजी विज्ञान महाविद्यालयात आयोजित ‘इन्स्पायर’ या विज्ञान शिबिरात नारळीकरांनी विद्यार्थ्यांशी मोकळेपणाने संवाद साधला. यावेळी त्यांनी वरील माहिती दिली.Þडॉ. नारळीकर यांनी खगोलशास्त्राच्या इतिहासापासून ते भविष्यात होऊ शकणाऱ्या घडामोडींपर्यंत निरनिराळ्या मुद्यांवर प्रकाश टाकला. इतर वैज्ञानिक शाखा पृथ्वीपर्यंत मर्यादित आहेत तर खगोलशास्त्राची झेप पृथ्वीबाहेर पसरलेल्या अमाप विश्वापर्यंत आहे. न्यूटनचा नियम पृथ्वीबाहेर कोट्यवधी किलोमीटरपर्यंत लागू होतो हे विधान फक्त खगोलशास्त्रच करू शकतो. गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावण्याचे श्रेय सर आयझॅक न्यूटन यांना देण्यात येते.परंतु केवळ सफरचंद त्यांच्या डोक्यावर पडले म्हणून हा शोध लागला नाही. तर त्याअगोदर होऊन गेलेले खगोलशास्त्रज्ञ व अभ्यासक टायको व केपलर यांच्या अभ्यासातून समोर आलेल्या बाबींवर हे प्रमेय मांडण्यात आले होते असे डॉ.नारळीकर यांनी सांगितले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.देवेंद्र बुरघाटे हे प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. अशोक बंड यांनी संचालन केले.२१२६ वर्षात पृथ्वीला धोकाखगोलशास्त्रातूनच पृथ्वीवर भविष्यात येणाऱ्या धोक्यांबद्दल भाकीत करणे शक्य झाले आहे. ‘स्विफ्ट टटल’ नावाचा धूमकेतूची २० आॅगस्ट २१२६ रोजी पृथ्वीशी टक्कर होऊ शकते, असे अभ्यासातून समोर आले आहे. परंतु अद्याप याला बराच वेळ आहे. त्यामुळे त्याचा मार्गात बदल होऊ शकतो. याबाबत निश्चित भाष्य या घटनेच्या काही वर्ष अगोदरच करता येणे शक्य आहे. या अभ्यासात खगोलशास्त्राचीच महत्त्वाची भूमिका राहणार आहे, असे डॉ.नारळीकर म्हणाले. अंतराळातून ऊर्जा घेणे शक्यआज ज्या पद्धतीने ऊर्जेचा वापर होत आहे ते पाहता ऊर्जानिर्मितीसाठी नवीन पर्याय शोधणे क्रमप्राप्त झाले आहे. अंतराळात मोठमोठाले भिंग स्थापित करून सौरप्रकाश जास्त प्रमाणात पृथ्वीकडे वळवून ऊर्जानिर्मिती करणे शक्य आहे. परंतु याचा खर्च प्रचंड असल्याने सद्यस्थितीत कुठल्याही देशाने याकरिता पुढाकार घेतलेला नाही या त्यांनी दिलेल्या माहितीमुळे उपस्थित आश्चर्यचकित झाले. गुरुत्वाकर्षण लहरींचा अभ्यास करण्यासाठी अमेरिका, युरोप, जपान या देशांनी अत्याधुनिक टेलिस्कोप असणाऱ्या वेधशाळा उभारल्या आहेत. रेखांशावरील स्थान लक्षात घेता भारतातदेखील अशी वेधशाळा उभारण्यास अमेरिकेने सहकार्य करण्याची तयारी दाखवली आहे. यासाठी महाराष्ट्रातील नांदेड, राजस्थान आणि मध्य प्रदेश ही ठिकाणे योग्य आहेत. यातील एकाची निवड करण्यासाठी संंबंधित प्रस्तावाला केंद्र सरकारकडे चर्चेसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. नारळीकर यांनी दिली.(प्रतिनिधी)
अंतराळातून आला ‘इबोला’?
By admin | Updated: January 14, 2015 01:12 IST