पंकज राऊत,
बोईसर- तारापूर अणुउर्जा केंद्र व भाभा अणु संशोधन प्रकल्पाच्या संरक्षणासाठी बांधलेल्या भिंतीपलिकडे घिवली गावातील विहिरी गेल्यामुळे येथे पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. दोन ते तीन किमी. अंतरावरून दिवसरात्र वणवण फिरून हंडाभर पाणी आणावे लागत आहे. कधी तेही मिळत नाही त्यामुळे पडीक विहिर अथवा खड्डे यातील दूषित पाणी वापरावे लागते आहे. भारतातील पहिल्या तारापूर अणुउर्जा प्रकल्पातील दोन अणुभट्टया व बीएआरसी या दोन्ही प्रकल्पापासून घिवली गाव १.६ किमी. त्रिज्येच्या आत म्हणजे अवघ्या १ कि.मी. असून १९६७-६८ च्या दरम्यान याच गावातील सोन्यासारखी घरे व जमिनी कवडी मोलाने प्रकल्पाकरीता घेतल्यानंतर सुमारे शंभर कुटुंबांचे नवी देलवाडी येथे पुनर्वसन त्यावेळी करण्यात आले तर १९८२ साली गावातील बारा कुटुंबांची घरे, जमीन घेऊन त्यांचेही इतरत्र पुनर्वसन करण्यात आले असून अणु प्रकल्पाच्या १.६ कि.मी. त्रिज्येच्या असलेल्या घिवली गावातील शेकडो कुटुंबे पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत आहेत.या गावाची लोकसंख्या सुमारे चार हजार असून या गावात पिढीजात पूर्वीपासून अकरा विहीरी होत्या. त्यापैकी तीन ते चार विहिरींचे पाणी पिण्यासाठी बरीच वर्षे वापरात होते मात्र अणुउर्जा केंद्राने या गावाच्या तिन्ही दिशांना सुमारे पंधरा फुट उंच मजबूत संरक्षक भिंत बांधल्याने या विहिरी भिंती पलीकडे म्हणजेच अणुकेंद्राच्या हद्दीत गेल्यात. गावात अवघ्या तीन विहीरी शिल्लक राहील्या परंतु त्यांचे पाणी अत्यंत दूषित खारट, गढूळ आणि पिण्यास अयोग्य असतांनाही ते पाणी गाळून व उकळून त्यात तुरटी फिरवून वापरावे लागते आहे. १९८६-८७ च्या दरम्यान घिवली गावांतील विहिरींचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा प्रयोगशाळेच्या आलेल्या अहवालानंतर तारापूर अणुउर्जा केंद्राने महारष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माधमातून नळ पाणी योजना सुरू केली मात्र तिची पाणी पाईप लाईन दुरून व वळसा घेऊन टाकल्याने ग्रामस्थांना पिण्याचे पाणी पुरेशा दाबाने मिळण्यांत अडथळे येत होते परिणामी पाण्याचे बिल थकत गेले व त्याची रक्कम आता २७ लाखाच्या घरात गेल्याने पाच-सहा महिन्यापासून नळपाणी योजना बंदच आहे. त्यामुळे येथील रहिवाशांवर हेची फल काय मम तपाला असा टाहो फोडण्याची वेळ आली आहे.