ऑनलाइन लोकमत
गंगामसला, दि. २ - दुष्काळ व भीषण पाणीटंचाईमुळे हतबल झालेल्या बीड जिल्ह्यातील गंगामसला गावातील ग्रामस्थांनी सामूहिक आत्महत्येचा इशारा दिला आहे. यासंदर्भातील ठरावच ग्रामस्थांनी मंजूर केला असून बीड जिल्ह्याच्या दौ-यावर असलेले मुख्यमंत्री या ग्रामस्थांना समस्या जाणून घ्यावात अशी मागणी केली जात आहे.
बीड जिल्ह्यातील गंगामसला या गावाजवळच माजलगाव धरण आहे. मात्र तरीदेखील या गावात भीषण पाणी टंचाईची समस्या आहे. पाणीचा प्रश्न कायम असतानाही गावातील शेतक-यांनी भरभक्कम वीज बिल धाडण्यात आल्याने शेतकरीही त्रस्त झाले आहेत. अखेरीस या गावातील ग्रामपंचायतीमध्ये थेट सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्री आज बीडमधील दुष्काळग्रस्त भागाच्या दौ-यावर असून आता त्यांनीच या ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली जात आहे.