संजय तिपाले, बीडस्त्री- भू्रण हत्येच्या घटनांनी प्रतिमा मलीन झालेल्या बीड जिल्ह्याचे डोळे अजूनही उघडले नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलीच्या जन्माचे स्वागत व्हावे यासाठी सुरू करण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजनेंतर्गत गेल्या वर्षभरात जिल्ह्याला एकही लाभार्थी मिळाला नाही. त्यामुळे त्यासाठी आलेले २५ लाख रुपये परत गेले. या वर्षातही सहा महिने उलटले तरी एकाही लाभार्थ्याचा शोध घेता आला नाही. जिल्ह्यात २०११ मध्ये दरहजारी मुलींचे प्रमाण ७९५ इतके खाली आले होते़ शिरुर तालुक्यात तर ते ७७९ वर घसरले होते. त्यामुळे केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने हा तालुका ‘रेड झोन’ मध्ये टाकला होता़ बीड, परळी येथे स्त्री- भ्रूण हत्येचे भयावह प्रकार लागोपाठ उघडकीस आल्यानंतर स्त्री भू्रण हत्येच्या प्रकरणात जिल्ह्यातील डझनभर डॉक्टरांना तुरूंगाची हवा खावी लागली. कन्येचा जन्म नाकारणाऱ्या जिल्ह्यातील अनेक घटनांनी संपूर्ण देश हादरला. त्यानंतर कन्या जन्माचे स्वागत करण्यासाठी आरोग्य विभागाने सामाजिक संस्थांच्या मदतीने जिल्हाभर जागर केला़ ‘लेक वाचवा अभियान’च्या अॅड़ वर्षा देशपांडे यांनी स्त्री- भू्रण हत्येविरोधी मोहीम बीडमध्ये येऊन गतीमान केली. त्याचा चांगला परिणामही पुढे दिसून आला़ आजघडीला स्त्री जन्मदर ९०३ वर पोहचला. ही समाधानाची बाब असली तरी जिल्हा प्रशासनाने या घटनांतून काहीच शिकले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे अधिकाऱ्यांनी शासकीय योजनेचा लाभ घेण्याचे साधे आवाहन करण्याची तसदीही घेतली नाही़ परिणामी आलेला निधी परत गेला़ यावर्षीही अशीच परिस्थिती आहे. २०१४मधील सहा महिने उलटले तरी एकही लाभार्थी मिळालेला नाही.
स्त्री भ्रूणाचे मोल बीड जिल्ह्याला कळेना
By admin | Updated: June 23, 2014 04:26 IST