नितीन गव्हाळे/अकोला: राज्यातील आरोग्य विभागाच्या तपासणी केंद्रांच्या माध्यमातून गतवर्षी १ लाख ५८ हजार ७८४ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १0 हजार ७0२ रुग्णांना क्षयरोगाची बाधा झाली असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आहे. प्रत्येक जिल्हय़ात क्षयरोग नियंत्रण विभाग आहे. या विभागांतर्गत जिल्हय़ात सूक्ष्मदर्शक थुंकी तपासणी केंद्रे आहेत. दरवर्षी क्षयरोगाच्या प्रतिबंधासाठी जनजागृती म्हणून आरोग्य विभागाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येतो. रुग्णांना मोफत औषधोचारही देण्यात येतो. गतवर्षी आरोग्य विभागामार्फत राज्यातील १४ लाख ७९ हजार ११९ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात १ लाख ५८ हजार रुग्ण संशयास्पद आढळून आले. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर १0 हजार ७0२ रुग्णांना क्षयरोगाची बाधा झाल्याचे समोर आले. या रुग्णांवर डॉट्स प्रणालीअंतर्गत उपचार व औषधोपचार करण्यात आले. आरोग्य विभागाच्या प्रयत्नांमुळे क्षयरोगावर थोडेफार नियंत्रण मिळविण्यात यश आले असून, २0१२-१३ मध्ये क्षयरोग रुग्णांची टक्केवारी ८.८१ टक्के होती.
राज्यात दहा हजारांवर रुग्ण क्षयरोगाने बाधित!
By admin | Updated: September 2, 2015 02:17 IST