ठाणे : कळवानाका येथे रस्ता रुंदीकरणात बाधीत झालेल्या शिवसेना शाखेचे काम बेकायदेशीरपणे सुरु आहे. या संदर्भात आपण पुराव्यांसह तक्रार करु नही कारवाई न केल्यामुळे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी आपल्या विशेषाधिकाराचे हनन केल्याचा आरोप करु न त्यांच्यावर हक्कभंग दाखल करण्याचा इशारा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्यपाल, विधानसभाध्यक्ष, मुख्यमंत्री, प्रधान सचिवांना पाठवलेल्या निवदेनाद्वारे दिला आहे. तर, या शाखेवर आगामी २४ तासात कारवाई न केल्यास बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा नगरसेविका मनिषा साळवी यांनी दिला आहे. एप्रिल-मे महिन्यात ठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रस्ता रुंदीकरण मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेदरम्यान गोरगरिबांचा हक्काचा निवारा जमीनदोस्त करण्यात आला होता. या रु ंदीकरणात बाधीत झालेल्या अनेक दुकानदारांची रोजीरोटी हिरावून घेतली आहे. तर, ज्यांची घरे तुटली आहेत. त्यांना भाड्याच्या घरांमध्ये पाठविले आहे. एकीकडे गरीब जनतेवर अन्याय होत असतानाच दुसरीकडे मात्र कळवा नाका येथील शिवसेना शाखा मात्र पूर्वीपेक्षा अधिक मोठ्या क्षेत्रफळावर अनधिकृतपणे उभारण्यात येत आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या आशीर्वादामुळेच या शाखेचे खुलेआमपणे बांधकाम केले जात आहे. या संदर्भात मध्यंतरी आव्हाड यांनी स्वत: विचारणा केली होती. तसेच, आयुक्त जयस्वाल हे रजेवर असल्यामुळे चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना पुराव्यांसह लेखी निवदेनही दिले होते. मात्र, अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. सार्वभौम सभागृहाचा सदस्य असतानाही चव्हाण यांनी आपल्या विशेषाधिकारांचा भंग केला आहे. तसेच कायद्याचाही अवमान केला आहे. त्यामुळे आगामी पावसाळी अधिवेशनात आपण त्यांच्यावर हक्कभंग दाखल करण्याची सूचना देणार असल्याचे त्यांनी या निवदेनात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)>राष्ट्रवादीच्या नगरसेविका मनिषा साळवी यांनीदेखील या शाखेच्या बेकायदा बांधकामासंदर्भात पालिकेशी पत्रव्यवहार केला असून आगामी २४ तासात या शाखेवर कारवाई न केल्यास बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
अतिरिक्त आयुक्तांवर हक्कभंगाचा इशारा
By admin | Updated: June 29, 2016 02:56 IST