मुंबई : पाकिस्तानातून स्वत:ची सारी यंत्रणा चालविणाऱ्या दाऊदने महाराष्ट्रात एकनाथ खडसेंना फोन करावा, एवढी वाईट वेळ त्याच्यावर आली का, अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी खडसे-दाऊद फोन प्रकरणाची खिल्ली उडवली. नुकतेच विलेपार्ले येथे यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षेत यशस्वी झालेल्यांचा राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दाऊदचा कथित कॉल प्रकरण आणि स्वीय सहायकाच्या लाचखोरी प्रकरणी एकनाथ खडसे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. या संदर्भात बोलताना राज म्हणाले की, ‘आपल्याकडे कोणत्याही विषयावर चर्चा चालत राहते. दाऊद पाकिस्तानमधून स्वत:ची यंत्रणा संभाळतो. तो तिथून खडसेंना कशाला फोन करेल, एवढी वाईट वेळ त्याच्यावर आली आहे का, आपल्याकडे काहीही झालं की लगेच तर्कवितर्क लावले जातात. सगळी मज्जा मज्जा चालली आहे,’ या शब्दांत राज यांनी या प्रकरणाची खिल्ली उडवली. महाराष्ट्रात मराठी तरुणांना आधी नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. त्यानंतर, उरलेल्या नोकऱ्या बाकीच्यांना दिल्या जाव्यात. स्थानिकांना प्राधान्य देण्याचा मुद्दा जागतिक स्तरावरही चर्चिला जातोय. स्थानिकांच्या मुद्द्यावरच इंग्लंडने युरोपियन संघाबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आता आणखी अनेक देश तेच करतील, पण इकडे मी हा मुद्दा उचलला की, लगेच संकुचिततेचा ठपका ठेवला जातो, असे सांगत युपीएससी, एमएपीएससीत यश मिळवित अधिकारी झाल्यानंतर महाराष्ट्राच्या विकासाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन राज यांनी केले. (प्रतिनिधी)
दाऊदवर इतकी वाईट वेळ आली का?- राज ठाकरे
By admin | Updated: June 27, 2016 04:52 IST