मुंबई : गुरुवारी आखाती देशांमध्ये धुमाकूळ घातलेल्या वादळाच्या कणांनी रविवारी मुंबईसह लगतच्या परिसराला घेरले. अरबी समुद्रमार्गे गुजरातच्या किनारपट्टीसह मुंबई आणि लगतच्या परिसरात दाखल झालेल्या या वाळूच्या वादळाने येथील वातावरण ‘धूळमय’ केले होते. मुंबईसह, ठाणे, नवी मुंबई परिसरातही सकाळपासून धूळयुक्तच वातावरण होते. रविवारी सकाळपासूनच नजरेस पडतील; एवढ्या खाली हे वाळूचे कण वातावरणात पसरले होते. शिवाय उंच आकाशात दाटून आलेल्या वाळूच्या कणांच्या स्तरांनी सूर्याचे किरणही काहीशा प्रमाणात अडविल्याने मुंबईत दिवसभर अंधूक वातावरण होते. सकाळपासूनच पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरही वाळूचे कण पसरले होते. त्यामुळे वाहनचालकांना त्रास जाणवत होता. दरम्यान, मुंबईसह ठाण्यातही वाळूच्या वादळाचे कण पसरले होते. शिवाय मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे, पनवेल परिसरातील वाहतूक मंदावली होती. (प्रतिनिधी)
महामुंबई परिसरात धुळवड!
By admin | Updated: April 6, 2015 04:27 IST