ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २५ - भाजपाचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतरही धनंजय मुंडे यांच्याकडून राजकारण सुरू असल्याचा टोला गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आमदार पंकजा मुंडे यांनी लगावला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्या बोलत होत्या.
मृत्यूवरचे राजकारण करणे चुकीचे आहे असे सांगतानाच जर सीबीआयच्या चौकशीत काही गडबड आढळली तर मी स्वत: गप्प बसणार नाही असे सांगायला पंकजा मुंडे या विसरल्या नाहीत. गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाताविषयी आणि सीबीआयच्या चौकशीबाबत अद्याप कोणी का माहिती देत नाही असा सवाल करून जर आपल्याला ही माहिती मिळाली नाही तर आपण स्वत: दिल्लीला जावून आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार आणि गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी नुकतेच दिले आहेत. या प्रश्नाची आठवण करून देत पत्रकारांने मुलाखतीत पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारला त्याला उत्तर म्हणून पंकजा यांनी काही लोक राजकारण करीत असल्याचे म्हटले. केंद्रात भाजपाचे सरकार असून राजनाथ सिंग हे केंद्रीय गृहमंत्री आहेत त्यामुळे आपल्याला दिल्लीत जावून आंदोलन करण्याची गरज नाही. सीबीआय त्यांचे काम करीत आहे. त्यात हस्तक्षेप करण्याची गरज नाही पण ज्यावेळी सीबीआयचा रिपोर्ट येईल त्यावेळी त्यात काही गडबड असेल तर आपण गप्प बसणार नसल्याचे पंकजा यांनी सांगितले. पंकजा मुंडे या सध्या पुन्हा संघर्ष यात्राच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेत आहेत. गोपीनाथ मुंडे यांनी याआधी सत्ताधा-यांच्या विरोधात संघर्ष यात्रा काढली होती. हाच धागा पकडून पंकजा यांनी पुन्हा संघषयात्रा सुरूवात केली आहे.