नवी मुंबई : घरफोडी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला वाशी पोलिसांनी अटक केली आहे. घरफोडी करून धूम ठोकण्याच्या तयारीत असताना गस्तीदरम्यान ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. अटक केलेले सर्व जण सराईत गुन्हेगार असून त्यांच्याकडून घरफोडीच्या अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.शहरातील वाढती गुन्हेगारी नियंत्रित करण्याच्या अनुषंगाने पोलिसांनी कंबर कसलेली आहे. रात्रीच्या गस्तींमध्ये वाढ केली असून संशयास्पद वावरणाऱ्यांची देखील झाडाझडती घेतली जात आहे. अशाप्रकारे वाशी पोलिसांची गस्त सुरू असताना एक सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद झाली आहे. वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे, निरीक्षक सूरज पाडवी यांच्या नेतृत्वाखाली परिसरात रात्र गस्त सुरू होती. यावेळी काही जण संशयास्पदरीत्या वावरत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. शिवाय पोलिसांना पाहताच त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्यांच्यावरील संशय बळावल्याने पोलिसांनी तत्काळ सर्वांना ताब्यात घेतले. अधिक चौकशीत ते सराईत गुन्हेगार असल्याचे उघड झाले. यानुसार पाच सराईत गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याविरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेले सर्व जण सराईत गुन्हेगार असून त्यांच्याकडून शहरातील घरफोडीचे अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. गुन्हेगारीला आळा बसावा याकरिता वाशी पोलीसांनी लोक सहभागातुन परिसरात सिसिटीव्हीचे जाळे पसरवले आहे. सुरक्षा रक्षकांचीही रात्रीची झोप उडवली आहे. तसेच रात्रीच्या गस्तीमध्ये देखील कमालीची वाढ केली आहे. (प्रतिनिधी)
घरफोडी करणाऱ्या टोळीला अटक
By admin | Updated: July 2, 2016 02:56 IST