आष्टी (जि. बीड) : डोक्यावर दीड लाखाचे कर्ज... मेहनतीने शेतात कांदा लागवड केली... पीक चांगले आले; पण अवकाळी पावसाने होत्याचे नव्हते झाले. त्यामुळे निराश झालेल्या पती- पत्नीने विषारी द्रव प्राशन केले. पतीचा उपचारादरम्यान गुरुवारी रात्री मृत्यू झाला तर पत्नीची मृत्यूशी झुंज सुरु आहे. ही हृद्रयद्रावक घटना वेताळवाडी येथे घडली.परमेश्वर संतराम काकडे (३०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांची पत्नी वैशाली हिच्यावर अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना सात एकर शेती असून खरीप हंगामात पावसाअभावी मोठे नुकसान सहन करावे लागले होते. बी- बियाणासाठी खासगी सावकाराकडून त्यांनी दीड लाखाचे कर्ज घेतले होते. रबीमध्ये त्यांनी तीन एकरवर कांदा लागवड केली होती. पीकही जोमात आले होते. मात्र, गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने तडाखा दिला. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले. कांद्यांना चिरा पडल्या व नंतर तो सडला. कांदा हातचा गेल्याने कर्ज फेडायचे कसे, ही चिंता काकडे दाम्पत्याना सतावत होती. (वार्ताहर)
कर्जबाजारी शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या
By admin | Updated: March 21, 2015 01:21 IST