ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १ - खड्डे, स्पीड ब्रेकर आणि रस्त्याचे बांधकाम सुरु असल्यामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये मागच्यावर्षभरात १०,७२७ जणांचा मृत्यू झाला. २०१४ च्या तुलनेत हे प्रमाण थोडे कमी आहे. मात्र खड्डयांमुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. २०१५ मध्ये खड्ड्यांमुळे ३४१६ जणांना आपला प्राण गमवावा लागला. २०१४ मध्ये खडड्यांमुळे ३०३९ मृत्यू झाले होते.
वाहतूक मंत्रालयाच्या रस्ते अपघातासंबंधीच्या अहवालानुसार महाराष्ट्रात खड्डयांमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण सातपटींनी वाढले आहे. या घटनांवरुन रस्ते देखभालीची जबाबदारी असलेल्या यंत्रणा कमी पडत असल्याचे स्पष्ट होते. देशात उत्तरप्रदेशात सर्वाधिक खराब रस्ते आहेत. २०१४ च्या तुलनेत २०१५ मध्ये तिथे खड्डयांमुळे मृत्यूचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी झाले आहे.
ज्या दिल्लीमध्ये शनिवारी दुचाकी खड्डयात फसल्यामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला त्याच दिल्लीमध्ये २०१५मध्ये खड्डयांमुळे दोन मृत्यू झाले. मागच्यावर्षी देशभरात खड्ड्यांमुळे १०,८७६ अपघातांची नोंद झाली. खड्डे, रस्ते अपघाताची सर्व माहिती गोळा करण्याचे प्रभावी माध्यम नसल्यामुळे हा आकडा वाढू शकतो.
अनेक अपघातांची नोंद होत नाही तसेच रस्ते अपघातातील मृत्यूची सखोल चौकशी सुद्धा होत नाही. अन्यथा हा आकडा आणखी वाढू शकतो. शहरातील पाणी निच-याची व्यवस्था सुधारत नाही तो पर्यंत खड्डे पडतच रहाणार असे सरकारी विभागामध्ये काम करणा-या रस्ते अभियंत्यांनी सांगितले.