ऑनलाइन लोकमत
उल्हासनगर, दि. 21 - उल्हासनगरमधील वडापाव विक्रेते चंदू रामरख्यानी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सोमवारी त्यांना किरकोळ कारणावरुन एका व्यक्तीकडून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यात ते 90 टक्के भाजले होते.
उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात समोरासमोर वडापावविक्रीचे स्टॉल लावण्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान ‘महालक्ष्मी जम्बो वडापाव’ दुकानदार चंदू रामरख्यानी यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जाळण्यात आले. या घटनेत रामरख्यानी हे 90 टक्के भाजले होते. त्यांच्यावर ऐरोलीच्या नॅशनल बर्न रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, रामरख्यानी यांना जाळण्याचा प्रयत्न करणारा सुरेश आहुजा हा फरार आहे.
उल्हासनगर कॅम्प नं. ४, रेल्वे स्टेशनबाहेर रामरख्यानी यांनी दुकान भाड्याने घेऊन वडापाव सेंटर सुरू केले. यापूर्वी सुरेश आहुजा याने हे दुकान भाड्याने घेऊन वडापावचा धंदा केला होता. महालक्ष्मी सेंटरसमोर आहुजा याचे नवीन वडापाव दुकान मंगळवारपासून सुरू होण्याची कुणकुण रामरख्यानी यांना लागली होती. याबाबत, आक्षेप घेतल्याने सुरेश व रामरख्यानी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. या रागातून सोमवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास आहुजाने बाटलीतून आणलेले पेट्रोल रामरख्यानी यांच्या अंगावर टाकून त्यांना पेटवून दिले.
भरदिवसा घडलेल्या या अमानुष घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. रामरख्यानी हे ९० टक्के भाजले. सुरुवातीला त्यांना मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नवी मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आल्याचे विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र शिरसाठ यांनी सांगितले. आरोपी आहुजा हा फरार झाला आहे.