नवी मुंबई : रबाळे ते ऐरोली दरम्यान रेल्वे पटरीलगत दोन मृतदेह मंगळवारी सकाळी आढळून आले. त्यापैकी एकाची ओळख पटलेली असून दुसऱ्याविषयी पोलिसांना कसलीच माहिती कळलेली नाही. एकाच्या खिशात चिलीम आढळून आल्याने ते गर्दुल्ले असून नशेतच रेल्वेतून पडले असल्याचा प्राथमिक अंदाज रेल्वे पोलिसांनी व्यक्त केला आहे.मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. रबाळे ते ऐरोली स्थानकादरम्यान ४०/४५ कि.मी. अंतरावर रुळालगतच्या पाण्याच्या चरीमध्ये मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार वाशी रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता, त्याठिकाणी दोन मृतदेह आढळून आले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी पाठवले असता, त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत असल्याचे स्पष्ट झाले. यावरून रात्रीच्या वेळी ते रेल्वेतून पडले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तर अंगझडतीमध्ये त्यांच्याकडे आधारकार्ड व पॅनकार्ड आढळून आले आहेत. यावरून त्यांची ओळख पटली आहे. जगतसिंग किसन सिंग व संतराज यादव अशी त्या दोघा मृतांची नावे असून त्यांच्या नातेवाईकांचा शोध सुरु असल्याचे वाशी रेल्वेचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद धावडे यांनी सांगितले. हे दोघेही २५ ते २७ वयोगटातले आहेत. दोघांच्याही खिशामध्ये चिलीम आढळून आलेली आहे. यावरून ते गर्दुल्ले असून रात्रीच्या वेळी नशेमध्ये रेल्वेतून पडले असावेत असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तर रेल्वेतून पडल्यानंतर दोघेही रुळालगतच्या चरीमध्ये साचलेल्या पाण्यात बुडाले असावेत. सकाळी मृतदेह पाण्यावर तरंगू लागल्यानंतर ही बाब निदर्शनास आली. (प्रतिनिधी)
रेल्वेतून पडून दोघांचा मृत्यू
By admin | Updated: August 3, 2016 02:37 IST