पाथर्डी (अहमदनगर) : पोस्ट खात्याने जिवंत माणसाला मृत ठरविले़ रजिस्टरवर मयत झाल्याचा शेरा मारून ते परत पाठविल्यामुळे प्रताप उघडकीस आला़.पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी शिराळ येथील शेख दादामिया महेबूब यांनी कृषी विभागाकडे माहिती अधिकारात माहिती मागितली होती. या सुनावणीचे पत्र तालुका कृषी विभागाने शेख यांना २० आॅक्टोबर रोजी पाठविले होते, परंतु दुसऱ्याच दिवशी म्हणजे २१ आॅक्टोबर रोजी ही व्यक्ती मृत पावली, असा शेरा मारुन ते पत्र कृषी विभागाला परत आले़ शेख यांना सुनावणी ३१ आॅक्टोबर रोजी असल्याचे समजल्यामुळे ते ३१ रोजी कृषी कार्यालयात गेले़ ‘तुम्ही मला सुनावणीबाबत कळविले का नाही,’ असा सवाल करीत शेख यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले असता, पत्र शेख यांना दाखविले़ मृत असा शेरा मारुन पत्र परत आल्याचे पाहून शेख यांना धक्काच बसला़
जिवंत माणसाला ठरविले मृत!
By admin | Updated: November 4, 2015 02:26 IST