मुंबई : सीबीएसई शाळा दप्तराविना भरवण्याची घोषणा मंडळाने केली आहे. पहिली आणि दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गृहपाठातून मुक्तता मिळणार आहे. या संदर्भात परिपत्रक जारी केले आहे.दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी मंडळाने आणखी काही उपाययोजनांची घोषणाही परिपत्रकात केली आहे. त्यात मंडळाने शाळांसोबतच पालक आणि शिक्षकांनाही त्यांच्या जबाबदाऱ्या आखून दिल्या आहेत. मंडळाने आखून दिलेले वेळापत्रक तंतोतंत पाळण्याची सूचनाही शाळांना करण्यात आली आहे, तर विद्यार्थ्यांनी वेळापत्रकानुसारच पुस्तके आणि वह्या आणल्या आहेत की नाही, याची तपासणी शाळांना करायला सांगितली आहे. विद्यार्थी इतर साहित्य आणत असल्यास, त्याचीही तपासणी करण्याची सूचना मंडळाने शाळांना दिली आहे.या आधी सरकारने विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन विद्यार्थ्यांच्या वय आणि वजनाच्या सरासरीनुसार आहे की नाही, याची पाहणी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्याला केराची टोपली दाखवण्यात आली होती. अखेर सीबीएसई मंडळाने घेतलेल्या पुढाकाराने इतर मंडळे आणि शाळा दप्तराच्या ओझ्यातून विद्यार्थ्यांची सुटका करतील, अशी आशा निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)
दप्तराविना शाळा
By admin | Updated: September 14, 2016 06:06 IST