पनवेल : दलित बांधवांना न्याय देण्याचे काम समाजकल्याण विभागातर्फे होणार आहे. दलित बांधवांनी उच्च शिक्षण घेणे गरजेचे आहे. ‘शिका, संघटित व्हा व संघर्ष करा’ ही बाबासाहेबांची शिकवण अंगीकारली तरच टिकाल असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी पनवेल येथे केले. आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात रविवारी आरपीआयच्या (आठवले गट ) वतीने आयोजित आनंद मेळाव्यात ते बोलत होते. राज्यात नागपूर, अमरावती, पुणे अशा महत्त्वाच्या ठिकाणी अभ्यासकेंद्र उभारणार असून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीनुसार नवी मुंबई येथे शिकण्यासाठी येणाऱ्या ५०० मुली व ५०० मुलांसाठी वसतिगृह उभारण्याची घोषणा करण्यात आली. कॅबिनेट मंत्री महादेव जानकर यावेळी म्हणाले, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास खात्याचा कारभार पारदर्शकपणे करणार असून धनगर समाजातील वादाचा फायदा विरोधी पक्षांनी घेतल्यानेच हा समाज अनेक योजनांपासून वंचित राहिला. कार्यक्रमाला रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आरपीआय जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, नगराध्यक्षा चारुशीला घरत, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, नगरपरिषदेचे पाणीपुरवठा सभापती अनिल भगत, महिला व बालकल्याण सभापती सीता पाटील, नगरसेवक प्रकाश बिनेदार, कल्पेश तोडेकर, मोहन गायकवाड, प्रभाकर कांबळे, नरेंद्र गायकवाड, महेंद्र मोरे, राहुल डाळिंबकर आदी उपस्थित होते.
दलित बांधवांनी उच्चशिक्षित होणे गरजेचे- बडोले
By admin | Updated: July 20, 2016 02:57 IST