डॉ. नरेंद्र दाभोलकरांची २0 आॅगस्ट २०१३ रोजी पुण्यामध्ये हत्या झाली. त्यानंतर दोन वर्षांतच कॉ. गोविंद पानसरेंची कोल्हापूर येथे आणि त्यांच्या हत्येला सहा महिने पूर्ण व्हायच्या आधीच डॉ. एम. एम. कलबुर्गींची रविवारी सकाळी हल्लेखोरांनी त्यांच्या घरीच धारवाड येथे हत्या घडवून आणली. तिघांच्याही हत्येत हल्लेखोरांनी जी कार्यपद्धती अवलंबिली आहे ते पाहता, त्याच्यामागे एकाच प्रकारची शक्ती आणि साखळी असावी याबद्दल संशयाला जागा आहे. या तिन्ही व्यक्तींचे कामही जवळपास सारख्याच पद्धतीचे. तिघेही विवेकाचा, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आणि मानवतेचा आग्रह धरणारे. त्या पद्धतीनेच संपूर्ण आयुष्यभर त्यांची वाटचाल झाली. डॉ. कलबुर्गी हे कर्नाटकातील धारवाड येथील. धारवाड येथील एका महाविद्यालयात काही काळ त्यांनी अध्यापन केले. कवी, नाटककार, समीक्षक आणि साक्षेपी इतिहासकार अशी त्यांची कर्नाटकात ख्याती आहे. काही काळ कर्नाटकातील हम्पी विद्यापीठाचे कुलगुरू पदही त्यांनी भूषविले. त्यांचे सर्वात मोठे काम म्हणजे लिंगायत धर्माचे त्यांनी चालविलेले शुद्धीकरण. या देशातील जवळपास सर्वच अगदी स्वत:ला पुरोगामी म्हणवले जाणारे धर्मही धर्मांधतेच्या विळख्यात सापडले आहेत. कर्नाटकात बहुुल असलेला लिंगायत धर्मही याला अपवाद नाही. बसवण्णा आणि त्यांच्या शरण अनुयायांच्या सहकाऱ्यांनी बौद्ध धर्मानंतर एका पुरोगामी जातपंथविरहित समानतेचा आग्रह धरणारा, सर्व प्रकारच्या शोषणाला नाकारणारा धर्म निर्माण केला होता. तत्कालीन व्यवस्थेला नाकारून अनेक दलित आणि कष्टकरी स्त्री-पुरुष समाजाने या धर्माला जवळ केले होते. डॉ. कलबुर्गी यांंनी इतिहासाचा धांडोळा घेऊन सप्रमाण सिद्ध करायला सुरुवात केली आणि लिंगायत धर्माला वीरशैव नावाच्या पंचाचाऱ्यांच्या सर्पील मिठीतून मोकळी करायला सुरुवात केली. कलबुर्गी यांच्या एकूण प्रयत्नाला कर्नाटकातून आणि महाराष्ट्रातूनही मोठाच प्रतिसाद मिळू लागला होता. यामुळे प्रतिगामी शक्ती नक्कीच हादरल्या असाव्यात. त्याचे पर्यवसान कलबुर्गी यांच्या हत्येमध्ये झाले असावे.प्रतिगामी शक्ती नेहमीच आपल्याला शत्रू वाटणाऱ्या शक्तींची हत्या करण्याचा मार्ग निवडत असते. कारण त्यांच्याकडे विवेकशील विचारांचे अधिष्ठान नसतेच मुळी. विवेकशील विचारांकडे जो नैतिकतेचा आणि मानवतेचा पाया असतो त्याच्या जोरावर क्रुसावर बळी जाऊनही, आपला मर्त्य देह संपूनही विवेकशील विचार संपत नाहीत. इतिहासात हे वारंवार घडले आहे. अगदी सॉक्रेटिसपासून ही परंपरा सुरू होते. युरोपमध्ये प्रतिगामी शक्तींनी इन्क्विझिशन्स केली. मध्य आशियामध्ये प्रतिगामी शक्तींनी कत्तली केल्या. भारतामध्ये नेहमीच म्हणजे बौद्धांपासून लिंगायतांपर्यंत सर्व पुरोगामी विचारांच्या धर्मपंथांच्या कत्तली करण्यात आल्या. बुद्धांचे हजारो अनुयायी, बसवण्णा व त्यांचे शरण अनुयायी, नामदेव, चोखोबा, तुकोबा या साऱ्यांच्याच हत्या झाल्या; पण त्यामुळे त्यांचे विवेकशील मानवतावादी विचार कधीच संपू शकले नाहीत. उलट अधिकाधिक विस्तारत राहिले. मी सुरुवातीलाच म्हटले आहे की, आपण एका भेकड पर्वातून चाललो आहोत. अशावेळी प्रतिगामी धर्मांध, अविवेकी, अवैज्ञानिक वृत्ती फोफावतात. कारण त्या मुळात विवेकशील विचारांच्या वाढत्या प्रभावामुळे धास्तावलेल्या असतात. त्यामुळे अलीकडच्या काळात डॉ. नरेंद्र दाभोलकरांपासून सुरू झालेली ही हत्येची मालिका कधी थांबेल हे सांगता येणे अवघड असले आणि यापुढे कुणाचा नंबर याचा तर्क करणेही अवघड असले तरी आता पुरोगामी शक्तींनीही सावध झाले पाहिजे. आपापसातले तपशिलातले किरकोळ मतभेद विसरून एक व्यापक साखळी करून संपूर्ण देशभरच एकजूट उभी केली पाहिजे. दाभोलकरांची हत्या म्हणजे केवळ ‘अंनिस’ने शोक व्यक्त करणे, गोविंद पानसरेंची हत्या म्हणजे एका पक्षाचा शोक किंवा कलबुर्गींची हत्या म्हणजे लिंगायतातील पुरोगामी शक्तींचा शोक हे जे काही पृथक चित्र दिसते ते दिसता कामा नये. कारण या साऱ्यांना जोडणारा एक समान दुवा आहे तो म्हणजे विवेकशील, विज्ञाननिष्ठ मानवतावादी समाज. आपणा सर्वांनाच तो हवा आहे. प्रतिगामी शक्ती ज्या भाबड्या सामान्य जणांच्या श्रद्धांचा उपयोग आपल्या स्वार्थासाठी आणि कुटिल हेतूसाठी करीत आहेत, ती सामान्य जनताही या महामानवांनी पाहिलेल्या आदर्श समाजाचीच इच्छा करते हे महत्त्वाचे. परवा दाभोलकरांच्या स्मृतिदिनादिवशी मोर्चातून चालताना एक चहाचा टपरीवाला उत्स्फूर्तपणे म्हणाला, ‘‘साहेब, कायबी करा, पण अशी माणसं मरता कामा नयेत’’. सामान्य माणसाच्या मनात ही भावना आहे. - राजा शिरगुप्पे,सामाजिक कार्यकर्ते, कोल्हापूर
दाभोलकर... पानसरे आणि आता कलबुर्गी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2015 00:59 IST