ऑनलाइन लोकमतभिवंडी दि. 23- मुंबई-नाशिक महामार्गावरील लोढाधाम येथून ठाण्याकडे निघालेल्या जैन साध्वीच्या जथ्याला काल रोजी माणकोलीजवळ अरुण कुमार क्वारीसमोर ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका साध्वीसह व्हीलचेअर मदतनीस अशा दोघी जागीच ठार झाल्या, तर गंभीर जखमी झालेल्या दोन महिलांवर उपचार सुरू आहे.साध्वी रंजना हिराचंद जैन (५२ रा. ठाणे ) व मदतनीस रत्नी (४० रा. झारखंड ) अशा मृत साध्वींची नांवे असुन साध्वी रंजना जैन त्यांच्यावर ठाण्यात बाळकुम येथील साकेत पाईपलाईन येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.तर मदतनीस रत्नी हिचे शव त्यांचे नातेवाईक झारखंड येथे घेऊन गेले. या अपघातात जखमी झालेल्या साध्वी शकुंतला चोपडा व मदतनीस सुमोनी माझी या दोघींवर ठाण्यातील ज्युपीटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.एकूण चार साध्वी झारखंड येथून तिर्थाटन करून ठाणे शहराकडे जात असताना ही दुर्घटना काल घडली.या साध्वी माणकोली बायपास नाक्याजवळील अरुणकुमार क्वारी समोर असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकचालकाने साध्वीच्या जथ्याला धडक दिली.या अपघात प्रकरणी ट्रक चालक दया शंकर यादव यास नारपोली पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी अटक करून कोर्टात हजर केले असता त्यास कोर्टाने जामीन दिला आहे.
अपघातातील साध्वींवर ठाण्यात अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2017 23:19 IST