मुंबई : भाकड गायी, निरुपयोगी बैलांच्या संगोपनासाठी गोवंश सेवा केंद्र योजनेची घोषणा आज राज्य शासनाने केली. त्या अंतर्गत गोशाळांना अनुदान देण्यात येणार आहे. दूध उत्पादन, शेतीकाम, पशुपैदास, ओझी वाहणे आदी कामांसाठी उपयुक्त नसलेल्या गाय, बैल, वळूंचा सांभाळ करण्यासाठी ही योजना असेल. त्यांच्यासाठी चारा, पाणी व निवाऱ्याची सोय उपलब्ध करून दिली जाईल. गोवंश हत्याबंदीचा निर्णय सरकारने यापूर्वीच घेतला आहे. तो घेतानाच निरुपयोगी गायी/बैलांची काळजी घेणारी व्यवस्था निर्माण केली जाईल, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला होता. त्याचाच परिपाक म्हणून आता ही नवीन योजना आणली गेली आहे. धर्मादाय आयुक्तांकडे नोंद असलेली संस्थाच या योजनेसाठी पात्र ठरेल. तसेच गोशाळेमध्ये मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी शासन प्रत्येकी एक कोटीचे अनुदान देईल. याशिवाय, या गोशाळांना केंद्र व राज्य सरकारच्या योजनांमधून चारा लागवडीसाठी बियाणे, खतांकरताचे अनुदान दिले जाणार आहे. गोशाळांची निवड करण्याचे अधिकार पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्र्यांच्या अध्यक्षखतेखालील समितीला असतील. मुंबई वगळता ३४ जिल्ह्यांसाठी ही योजना यंदापासून लागू करण्यात येणार आहे. (विशेष प्रतिनिधी)
भाकड गायी, निरुपयोगी बैलांसाठी गोवंश सेवा केंद्र
By admin | Updated: April 28, 2017 02:52 IST