प्रदूषणांमुळे वाढतेय रुग्णांची संख्या नागपूर : वाढते धूर व प्रदूषणांमुळे क्रॉनिक आॅब्स्ट्रॅक्टीव्ह पल्मनरी डिसीज (सीओपीडी) या फुफ्फुसांच्या व्याधीचे प्रमाण जगभरात वाढत आहे. भारतात सुमारे १५ दशलक्ष व्यक्ती या व्याधीने त्रस्त आहेत. सुरुवातीला या आजाराची फारशी लक्षणे दिसून येत नाही. यामुळे बहुसंख्य रुग्ण तिसऱ्या टप्प्यात उपचारासाठी येतात, परिणामी युरोपच्या तुलनेत भारतात सीओपीडीचे चारपट जास्त मृत्यू होतात. नागपुरात नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात मागील सहा महिन्यात सीओपीडीचे ३१५ रुग्ण आढळून आले आहेत. धक्कादायक म्हणजे, यात धुम्रपान न करणाऱ्यांची संख्या मोठी आहे, अशी माहिती छातीरोग तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांनी आज येथे दिली. १९ नोव्हेंबरला जागतिक सीओपीडी हा दिवस पाळला जातो, त्याच्या पूर्वसंध्येला ते पत्रकारांशी बोलत होते. डॉ. अरबट म्हणाले, सीओपीडीबद्दल असलेले अज्ञानच मृत्यूला कारणीभूत असलेले हे तिसरे मोठे कारण ठरत आहे. तंबाखूचा धूर, बायोमास इंधनाचा धूर, औद्योगिक प्रदूषण, वाफा आणि पर्यावरणीय प्रदूषके या कारणांमुळे सीओपीडी हा आजार बळावत आहे. अस्थमा आणि सीओपीडीच्या रुग्णांना श्वास घेण्यात त्रास होणे ही समान समस्या आहे, मात्र सीओपीडी म्हणजे अस्थमा नव्हे, त्याचे वेगळे निदान होणे गरजेचे आहे. सीओपीडीची सुरुवातीचे लक्षणे न जाणारा कफ, कफाचे बेडके आणि व्यायाम करताना किंवा पायऱ्या चढताना श्वास घेण्यात होणारा त्रास, अशी आहेत. परंतु अनेक जण याकडे दुर्लक्ष करतात. नंतर जेव्हा आजार वाढतो पायऱ्या चढायला, फिरायला जाताना किंवा सकाळच्यावेळी आंघोळ करताना, कपडे घालताना श्वास घेण्यास अडचण जाणवू लागते तेव्हा रुग्ण उपचारासाठी डॉक्टरांकडे येतात. मात्र तोपर्यंत रुग्ण तिसऱ्या टप्प्यात गेलेला असतो. अशा रुग्णांची संख्या ९० टक्के आहे. या आजाराचा रुग्णाला फार लवकर मधुमेह, उच्चरक्तदाब, लकवा, ओस्टिओपोरीसीस सारखे आजार होण्याची शक्यता अधिक असते. यामुळे या आजाराचे निदान जितक्या लवकर होईल, तितक्याच प्रभावीपणे हा उपचार करणे शक्य आहे. विशेष म्हणजे, अवघ्या सहा सेकंदांच्या तपासणीतून याचे निदान होते. (प्रतिनिधी)धूम्रपान न करणाऱ्यांची संख्या मोठी क्रीम्स इस्पितळाने छातीचा आजार असलेल्या रुग्णांवर सर्वेक्षण केले. मे ते आॅक्टोबर-२०१४ या सहा महिन्यात सीओपीडीचे ३१५ रुग्ण आढळून आले. यात २५९ पुरुष तर ५६ महिलांचा समावेश होता. तब्बल ५३ टक्के रुग्ण आजाराच्या तिसऱ्या टप्प्यात होते. यातील १५० रुग्ण धूम्रपान करीत होते तर १६५ रुग्ण धूम्रपान न करणारे होते. याला वातावरणातील वाढते प्रदूषण कारणीभूत आहे, असे डॉ. अरबट यांचे म्हणणे आहे.डास पळवणारी अगरबत्ती सोडते १०० सिगारेटचा धूर डास पळवणारी एक अगरबती रात्रभर सुरू राहिल्यास ती १०० सिगारेटचा धूर सोडते, हे सर्वेक्षणातून समोर आले आहे. सीआरएफ या संस्थेने हे सर्वेक्षण केले आहे. डॉ. अरबट यांच्या मते, सीओपीडीला हा धूरही कारणीभूत ठरू शकतो. साधारण रात्रीच्या वेळी ही अगरबत्ती अनेक जण लावतात; सोबतच डास घरात येऊ नये म्हणून दारे-खिडक्या बंद ठेवतात, अशा वेळी हा धूर धोकादायक ठरू शकतो.
सीओपीडीचे भारतात १५ दशलक्ष रुग्ण
By admin | Updated: November 19, 2014 00:51 IST