नितीन गडकरी : भाऊराव देवरस मानव संसाधन विकास संस्थेतर्फे प्रगट मुलाखत नागपूर : केंद्रीय मंत्री म्हणून संपूर्ण देश माझे कार्यक्षेत्र आहे. त्या दृष्टीने अनेक कामांना मंजुरी दिली आहे पण नागपूर, विदर्भासाठीही विशेष योजनांची अंमलबजावणी करायला मी प्रारंभ केला आहे. नागपूरकरांना माझ्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या तुलनेत तिप्पट कामे या पाच वर्षात झालेली असतील. आत्तापर्यंत नागपुरात १२ ते १३ हजार कोटींच्या कामांना मी मंजुरी दिली असल्याची माहिती केंद्रीय परिवहन आणि ग्रामविकास मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. भाऊराव देवरस मानव संसाधन विकास आणि शोध प्रतिष्ठानतर्फे ‘नागपूर आणि विदर्भाचा विकास - २०२०’ विषयावर त्यांच्या प्रगट मुलाखतीचा कार्यक्रम साई सभागृह, शंकरनगर येथे आयोजित करण्यात आला. याप्रसंगी विविध प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी नागपूर-विदर्भाच्य विकासाचे मुद्दे उलगडले. विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुर्दैवी आहेत. शेतकऱ्यांना २४ तास पाणी आणि वीज मिळाली पाहिजे. विदर्भाची जमीन सिंचनाखाली आणण्यासाठी नुकताच एक निर्णय घेतला आहे. मालगुजारी तलावातील कचरा काढून तेथे पाणी साठविण्याची योजना आहे. यामुळे विदर्भातील सहा हजार मालगुजारी तलाव स्वच्छ होतील. याशिवाय जलसंवर्धनाच्या कामात आपण विशेष लक्ष घालतो आहोत. यामुळे विदर्भाची ७५ टक्के जमीन सिंचनाखाली येईल. शेतकऱ्यांना एक लाख सोलरपंप देण्याची योजना आहे. वीज, पाणी यांची मुबलकता असल्यावर एकही शेतकरी त्यानंतर आत्महत्या करणार नाही, त्याचे काम सुरू आहे, असे ते म्हणाले. विदर्भात २० हजार कोटींचे प्रकल्प बंद आहेत. यासंदर्भातील सर्व प्रोजेक्टवर १५ आॅगस्टपूर्वी निर्णय घेऊन त्यांना मार्गी लावणार आहे. पर्यावरणाच्या नावाखाली दहशतवाद सुरू आहे. आपण पर्यावरणाच्या विरोधात नाही पण पर्यावरण आणि विकास यांचे संतुलन साधून विकासाला मार्ग मोकळा करून देणार आहे. पर्यावरणासंदर्भातील कायद्यामुळे विकासाला बाधा निर्माण होते आहे. विकास, रस्ते आणि उद्योग हवा असेल तर दोहोंचे संतुलन साधणे गरजेचे आहे. आरटीओचे सारेच काम येत्या तीन महिन्यात कॉम्प्युटराईज्ड करणार आहे. त्यानंतर वाहतूक पोलिसांची गरजच भासणार नाही. कुणी कायदा तोडला तर त्याचे चालान त्याच्या घरी पोहोचले असेल. विदर्भात हजारो टन सोने आहे, मिनरल्स आहेत. राज्यातले ७५ टक्के मिनरल्स विदर्भात असून त्यावर आधारित उद्योग येथे उभारता येत नाही.पर्यावरणाचा कायदा मात्र सरकार स्वत: बदलविणार नाही. आज सर्वात श्रीमंत जिल्हा गडचिरोली आहे पण सर्वात गरीब लोक तेथेच आहे. कारण उद्योग आणि विकासाला अडसर निर्माण केला जातो. हा अडसर दूर करुन विकास साधण्याचा प्रयत्न माझा आहे. यानंतर एकही झाड न तोडता ते दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सप्लान्ट करण्याचे तंत्रज्ञान आपण आता स्वीकारले आहे. मिहानसाठी राज्याचे सहकार्य हवेमिहानच्या विकासासाठी आपण सातत्याने प्रयत्नरत आहोत. मिहानच्या अडचणी सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना तीन पत्रे आणि दोन फोन केले पण कार्यबाहुल्यामुळे त्यांनी बैठकच आयोजित केली नाही. मिहानच्या एअर टॅक्सी वेचे काम सुरू केलेले आहे. मिहानच्या विकासासाठी राज्य शासनाला जी मदत हवी असेल ती करायला आपण तयार आहोत. एम्ससाठी जागा निश्चित करणारनागपुरात एम्स यावे म्हणून मी विशेष प्रयत्न केले. त्यासाठी जागेचा शोध सुरू आहे पण मेडिकल कॉलेजजवळ एम्स व्हावे, अशी इच्छा आहे. ज्यामुळे आरोग्य सेवा गरीब रुग्णांना तातडीने मिळेल. हल्ली सारेच पश्चिम नागपुरात घडते आहे. महाल, उत्तर नागपुरातही काहीतरी चांगले झाले पाहिजे. त्यासाठी रेशीमबागमध्ये क्रीडा संकुल, महालचे रस्ते मोकळे आणि काँक्रीटचे करण्याचा प्रयत्न आहे. उत्तर नागपुरात सिकलसेलचे इन्स्टिट्युट उभारण्याचे निश्चित केले आहे. मेडिकल कॉलेजला १२५ कोटी रुपये मिळाले पण त्यातील ३४ कोटीच खर्च झाले. हा निधी योग्य कामात खर्च व्हावा म्हणून प्रयत्न करीन.विदर्भात पर्यटन वाढविणार चिखलदरा, पचमढी, नागझिरा, विदर्भातले व्याघ्र प्रकल्प आदींकडे पर्यटकांचा ओढा वाढविण्यासाठी काही योजना तयार केल्या आहेत. सिडकोतर्फे चिखलदऱ्याचा विकास करण्यात येणार आहे. येथून वाराणसीपर्यंत असलेले बौद्ध सर्कीट विमानाने जोडण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूरजवळची सर्व पर्यटनस्थळे सी प्लेनने (पाण्यातून पाण्यावर उतरणारे छोटे विमान) जोडणार आहे. त्यासाठी एअरपोर्ट सारखे वॉटर पोर्ट तयार करण्यावर काम सुरू आहे. १० हजार कोटींचा मोठा प्रकल्प नागपुरात सुरू करणार आहे. पर्यटनस्थळी योग्य सोयीसुविधा निर्माण केल्या तर पर्यटनाच्या माध्यमातून विदर्भाच्या विकासाचे स्वप्न आहे. नागनदीतून जलवाहतुकीचे स्वप्न महापौरांनी नागनदी स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले. त्यामुळे नागनदीचा घाण वास संपला आणि पाणी स्वच्छ झाले. याच्या पुढच्या टप्प्यासाठी ११७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नागनदी संपूर्ण स्वच्छ करून त्यातून जलवाहतूक सुरू करण्याची योजना आहे.बीजिंग आणि अॅमस्टरडॅम प्रमाणेच रिटायर्ड लोक नागनदीच्या काठावर स्वच्छ पाण्यासह गप्पा मारताना मला पाहायचे आहेत. त्यासाठी माझा प्रयत्न असला तरी जनतेचे सहकार्य असायला हवे. याप्रसंगी गडकरींची मुलाखत ज्येष्ठ पत्रकार सुनील चावके यांनी घेतली. कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे प्राचार्य योगानंद काळे, नरेन्द्र जोशी, शिरीश भगत उपस्थित होते. (प्रतिनिधी)काँग्रेस कार्यकर्त्यांचेही काम करुन देणारपक्षीय राजकारणात विरोध केवळ निवडणुकांपुरता असतो. काँग्रेसच्या ज्या दोन आमदारांनी माझ्याविरोधात काम केले त्यांचेही काम मी नुकतेच करून दिले. नागपुरात ज्या काँग्रेस कार्यकर्त्यांनीही माझ्या विरोधात काम केले त्यांचेही एखादे काम चांगले आणि प्रामाणिक असेल तर काँग्रेस कार्यकर्त्यांनीही माझ्याकडे बिनदिक्कत यावे. त्यांचे काम मी करून देईल. शरद पवार माझे चांगले मित्र आहे पण आम्ही दोन तास एकत्र असताना दहा मिनिटेच राजकारणावर बोलतो. उर्वरित वेळ अवांतर बोलतो. पक्षांच्या राजकारणात वैयक्तिक शत्रू नसावेत. सर्वांनी मिळूनच देशाचा विकास शक्य आहे.
जनतेच्या अपेक्षांपेक्षा तिप्पट काम पूर्ण करणार
By admin | Updated: July 20, 2014 01:23 IST