मुंबई : राज्याच्या सिंचन क्षेत्रातील सुधारणांसाठी ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सुचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने आज वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक समिती नेमली. चितळे समितीने आपला अहवाल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे १ मार्च २०१४ रोजी सादर केला होता. या अहवालावरील कार्यपालन अहवाल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत १४ जून रोजी मांडण्यात आला. त्या वेळी चितळे समितीने सुचविलेल्या सुधारणांच्या अंमलबजावणीस कटिबद्ध असल्याचे शासनाने स्पष्ट केले होते. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शासनाने सुधारणांच्या अंमलबजावणीसाठी नियोजन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. त्यात वित्त, महसूल, कृषी व पणन, जलसंपदा, जलसंधारण, रोहयो, पाणीपुरवठा व स्वच्छता, वने, ग्रामविकास, मदत व पुनर्वसन आदी विभागांच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. चितळे समितीने सुचविलेल्यांपैकी ४२ सुधारणांच्या अंमलबजावणीचे काम ही समिती करेल. (विशेष प्रतिनिधी)
चितळे अहवालाच्या अंमलबजावणीसाठी समिती
By admin | Updated: August 26, 2014 03:17 IST