ठाणे : भाजीपाल्याच्या भाववाढीने अनेक भाज्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्यातच प्रत्येक भाजीला स्वादिष्ट करणारी कोथिंबीरही भाजीमंडईत ‘भाव’ खात असून ती शतकाच्या उंबरठ्यावर गेली आहे. शेवग्याच्या शेंगा, मटारसह अनेक फळभाज्यांनी उच्चांक गाठल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. पाऊस लांबल्याने भाज्यांचे दर वाढण्यास सुरुवात झाली. गेल्या १५ दिवसांपासून काही भाज्यांचे दर जैसे थे असून काही मोजक्या भाज्यांचे दर कमी झाले. काही भाज्या बजेटच्या आवाक्याबाहेर गेल्याने स्वयंपाकघरांतील फळभाज्यांच्या टोपल्या रिकाम्या झाल्या आहेत. एकीकडे भेंडी, गवार, शिराळे यांचे दर कमी होत असताना दुसरीकडे आवक घटल्यामुळे शेवग्याच्या शेंगा, मटार यांचे दर मात्र वधारत चालले आहे. पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर वाढत्या दरामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कांदापातीनेदेखील कोथिंबिरीच्या पावलावर पाऊल ठेवत दराचा उच्चांक गाठला आहे. ८० च्या घरात कांदापात पोहोचली आहे. शेपूने १५ रुपयांवरून थेट अर्धशतक गाठले आहे. वाढत्या दरांमुळे गृहिणींमध्ये नाराजी व्यक्त केली जात असताना भाज्यांना मिळणाऱ्या कमी प्रतिसादामुळे विक्रेतेदेखील चिंतेत आहे. (प्रतिनिधी)महाबळेश्वरचे टोमॅटो बाजारातपुण्याच्या टोमॅटोची ८० रुपये किलो दराने विक्री सर्वत्र सुरू असताना आजपासून महाबळेश्वरचे टोमॅटो बाजारात दाखल झाले आहे. गोल आकाराचे असलेले हे टोमॅटो गावठी टोमॅटो म्हणूनदेखील ओळखले जातात. सध्या या टोमॅटोचे दर १२० रु. किलो असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
कोथिंबिरीची जुडी १०० रु.
By admin | Updated: June 30, 2016 02:28 IST