मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कार्य केवळ देश पारतंत्र्यातून मुक्त करण्यापुरतेच नव्हते, तर राष्ट्राचा सर्वांगीण विकास करून जगात प्रबळ करण्याकडे त्यांचा कल होतो, त्यामुळे त्यांना गुरूस्थानी मानून वंदन करणे, हे देशप्रेमी नागरिकांचे आद्य कर्तव्य ठरते, असे विचार स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी व्यक्त केले.स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने गुरूपौर्णिमेनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, सदस्य महेश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांनुसार कार्य करत राहिले पाहिजे, तरच आपण देशाला एका वेगळ्या उंचीवर नेऊ शकतो. याउलट काहीजण विनाकारण त्यांच्या राष्ट्रकार्याची महती माहिती असून त्यांच्याबद्दल शंका घेतात, हे त्यांचे कृत्य म्हणजे आपल्या गुरूच्या बाबतीत कृतघ्नपणा दाखविण्यासारखे आहे, असेही रणजित सावरकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
सावरकरांना वंदन करणे नागरिकांचे कर्तव्य
By admin | Updated: July 20, 2016 02:22 IST