ऑनलाइन टीम
पंढरपूर, दि. ९ - आषाढी एकादशीच्या पावन दिवशी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सपत्नीक विठ्ठल-रखुमाईची पूजा केली. लाखो वैष्णवजनांच्या उपस्थितीत आज आषाढी एकादशीचा महासोहळा पार पडत आहे. पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण यांनी आज पहाटे विठ्ठलाची महापूजा करत 'राज्यात भरपूर पाऊस होऊ दे, समृद्धी नांदू दे' अशी प्रार्थना विठूरायाच्या चरणी केली. यावेळी केलेल्या रोषणाईने विठोबा रखुमाईचे मंदिर उजळून निघाले होते. लाखो वारकरी ही क्षणचित्रं डोळ्यात साठवून घेत होते. दरम्यान, कर्नाटकातील बिदर येथील रहिवासी असणा-या राम व प्रमिला शेळके हे दाम्पत्य मानाचे वारकरी ठरले. विठ्ठल मंदिर समितीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पालकमंत्री दिलीप सोपल, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार सुरेश खाडे, उपस्थित होते.