ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - उद्योगपतींचे 'शेजारच्या राज्यात' सरकणे महाराष्ट्राला परवडणारे नसून मुख्यमंत्र्यांनी ही गळती रोखून महाराष्ट्र व्हायब्रंट करण्यावर भर द्यावा असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडले आहे. महाराष्ट्राचे नंदनवन करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांचीच असून त्यांना यापुढे गुजरातचे दाखले देता येणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
गांधीनगरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या व्हायब्रंट गुजरात या परिषदेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनातील अग्रलेखामध्ये याविषयी त्यांची भूमिका मांडली. वीज, पाणी, स्वस्त जमीन आणि औद्योगिक सुविधा या सर्व सोयी मोदींनी उद्योगपतींना उपलब्ध करुन दिल्या व त्यामुळे राज्यातील उद्योजक गुजरातमध्ये सरकू लागल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. असे व्हायब्रंट उपक्रम देशातील अन्य राज्यांमध्येही केल्यास संपूर्ण देश व्हायब्रंट होईल असेही त्यांनी नमूद केले.