ऑनलाइन लोकमत -
पुणे, दि. 30 - सध्याच्या काळात तंत्रज्ञान झपाटयाने बदलत आहे. संरक्षण क्षेत्रात तर हा वेग खुप जास्त आहे. विशेषत: देशाला बाह्य व अंतर्गत धोके वाढत असल्याच्या काळात तर तंत्रज्ञानाचा वापर जास्तीत जास्त व्हायला पाहिजे. म्हणूनच एनडीए सारख्या संरक्षण शिक्षण देणाऱ्या संस्थामध्ये आणि संरक्षण शिक्षणात अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रमाचा वापर होणे आवश्यक आहे असे वक्तव्य अनिल सहस्त्रबुद्धे (अध्यक्ष, एआयसीटीई) यांनी एनडीएच्या 130 व्या पदवी प्रदान सोहळया प्रसंगी केले. यावेळी एनडीएच्या महाविद्यालयचे प्राचार्य प्रा डॉ ओमप्रकाश शुक्ला, वाइस एडमिरल अशोक कुमार उपस्थित होते.
एनडीए ही भारतातच नाही, तर जगात संरक्षण विषयक सर्वोत्तम शिक्षण देणारी संस्था आहे. या संस्थेचा देशाला अभिमान आहे. एनडीएच्या शिक्षणात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर वाढावा यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आमच्याकडे एनडीएने बी.टेक साठी सादर केलेल्या प्रस्तावाची प्रक्रिया लवकरच पुर्ण होईल असेही त्यांनी सांगितले.
हजारो जणांना पदव्या मिळतात मात्र तुम्हाला मिळत असलेली पदवी जास्त महत्वाची आहे असेही ते म्हणाले. यावेळी 298 विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली त्यातील 64 जणांना बॅचलर ऑफ आर्ट्स, 110 जणांना बॅचलर ऑफ सायन्स आणि 124 जणांना कॉम्प्युटर ऑफ सायन्स ही पदवी देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांचे पालकही उपस्थित होते.
देशाच्या संरक्षण क्षेत्रातील अधिकारी घडवाणा-या पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील पदवीप्रदान सोहळा पार पडला. हा १३० व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा होता. एनडीएमध्ये नौदल, हवाई दल आणि पायदळ तिन्ही क्षेत्रांसाठी अधिकारी घडवले जातात.