मुंबई : मुंबई आॅटोरिक्षा-टॅक्सीमेन्स युनियनकडून सोमवारी पुकारण्यात आलेल्या रिक्षा बंद आंदोलनामुळे मुंबई उपनगरवासीयांना मोठे हाल सोसावे लागले. मुंबईकरांना मोठी पायपीट करावी लागली. संपामुळे बेस्ट बसेसमध्येही मोठी गर्दी झाली होती. बीकेसी येथील ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाला तर कुर्ला आणि वांद्रे येथून पोहोचण्यासाठी अनेकांना बरीच कसरत करावी लागली. रिक्षा बंद करूनही मागण्यांवर परिवहन विभागाकडून निर्णय घेण्यात न आल्याने आगामी तीन दिवसांत आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल, अशी माहिती युनियनकडून देण्यात आली. मुंबईत ओला, उबर, टॅक्सी फॉर शुअरसारख्या कंपन्या प्रवाशांची अवैध वाहतूक करत आहेत. त्यांच्यावर शासनाने कठोर कारवाई करावी, या मागणीसह अनेक मागण्या युनियनकडून करण्यात आल्या होत्या. त्यासाठी सोमवारी रिक्षा बंदची हाक देण्यात आली. त्यानुसार जवळपास ८३ हजार रिक्षा बंदमध्ये सामील होतील, असे युनियनकडून स्पष्ट करण्यात आले होते. या बंदमध्ये काही प्रमाणात रिक्षाचालक सामील झाले. मुलुंड, भांडुप, कांजूरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला तर वांद्रे, सांताक्रूझ, अंधेरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरीवली परिसरात बऱ्यापैकी रिक्षा बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्यांना स्थानक गाठण्यासाठी पायपीट करण्याशिवाय पर्याय नव्हता. शाळेत पोहोचण्यासाठी पालकांना मुलांसह बरीच कसरत करावी लागली. याच भागांमध्ये अन्य युनियनकडून रिक्षा सुरू ठेवण्यात आल्याने थोडीफार मदत स्थानिकांना मिळत होती. तर खासगी बसद्वारेही प्रवाशांची वाहतूक सुरू होती. काही रेल्वे स्थानकांबाहेर असणाऱ्या शेअर रिक्षाही पोलीस संरक्षणात सुरू ठेवण्यात आल्याने स्थानकाबाहेर येताच प्रवासी पटकन रिक्षा पकडताना दिसत होते. संध्याकाळी सहानंतर तरी रिक्षा सुरू होतील, अशी आशा बाळगणाऱ्या उपनगरवासीयांची ही आशा फोल ठरली. युनियनकडून परिवहन आयुक्तांकडे मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. मात्र हे निवेदन सादर केल्यानंतरही त्यावर ठोस निर्णय न झाल्याने मुंबई आॅटोरिक्षा-टॅक्सीमेन्स युनियनकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. पुढील आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
बंदमुळे मुंबईकरांची पायपीट
By admin | Updated: February 16, 2016 03:44 IST