मुंबई : चलनातून बाद केलेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बँकेत भरण्याबाबत पंतप्रधानांनी जाहीर केलेला निर्णय सरकारने अध्यादेश काढून रद्द केला आहे. ही सर्वसामान्य जनतेची फसवणूक असून, या प्रकरणी राज्य सरकारने केंद्र सरकारविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. पत्रकारांशी बोलताना सावंत म्हणाले की, ‘जे लोक ९ नोव्हेंबरनंतर देशाबाहेर होते, फक्त त्यांनाच जुन्या नोटा बदलून घेता येणार आहेत. सरकारच्या या आदेशामुळे रिझर्व बँकेने जुन्या नोटा जमा करून घेण्यास नकार दिला आहे. यामुळे विविध कारणांनी ३१ डिसेंबरपर्यंत ज्या लोकांना नोटा जमा करता आल्या नाहीत, त्यांची मोठी अडचण झाली आहे. जनेतेची ही आर्थिक फसवणूकच नाही, तर सर्वसामान्यांच्या कष्टाच्या पैशावर सरकार पुरस्कृत दरोडा आहे,’ असे ते म्हणाले.(प्रतिनिधी)
‘केंद्र सरकारविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करा’
By admin | Updated: January 5, 2017 04:08 IST