ऑनलाइन टीम
पुणे दि.३१ - डोंगरकडा कोसळून आख्खं गाव गाडलं जाण्याच्या माळीण दुर्घटनेप्रकरणी तालुका कृषी अधिका-यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते सुरेश तळेकर यांनी डोंगरमाथ्यावर केलेल्या शेतीमुळं, झाडांची तोडणी केल्यामुळे झालेल्या जमिनीच्या स्खलनामुळे ही घटना घडल्याचा आरोप करत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर घोडेगाव पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुका कृषी अधिका-याला याप्रकरणी आरोपी करण्यात आलं आहे.
माळीण गावावर काल पहाटे दरड कोसळून संपूर्ण गाव उध्वस्त झालं आहे. या गावात ६७ घरे होती, ज्यापैकी जवळपास ५० घरं गाडली गेली. आत्तापर्यंत जवळपास ३० मृतदेह राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने बाहेर काढले असून अद्याप सुमारे १५० जण गाडले गेले असल्याची भीती व्यक्त होत आहे. ही दुर्घटना होऊन ३० तास उलटले असले तरी अद्याप मदतकार्य सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर डोंगर पोखरून केलेल्या शेतीमुळे आणि झाडांची कत्तल केल्याने जमिनीची धूप झाल्याने असा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.