कऱ्हाड (जि. सातारा) : ‘महाराष्ट्र हे उत्तर प्रदेशपेक्षा श्रीमंत राज्य आहे. जर उत्तर प्रदेश सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देत असेल तर महाराष्ट्रात का नाही, असा सवाल करीत शेतकऱ्यांचा भ्रमनिरास करणाऱ्या राज्य सरकारला जाग आणण्यासाठी शेती प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलवावे, अशी आम्हा सर्व विरोधकांची मागणी आहे. यासंदर्भात येत्या २ मे रोजी शिष्टमंडळासह राज्यपालांना भेटणार असून, शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष थांबणार नाही,’ असे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.संघर्ष यात्रेनिमित्त कऱ्हाडात आलेल्या विरोधी पक्षाच्या आमदारांची पत्रकार परिषद झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आरपीआयचे जोगेंद्र कवाडे, आमदार अबू आझमी, डॉ. पतंगराव कदम, जयंत पाटील, शशिकांत शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.चव्हाण म्हणाले, ‘राज्य आणि केंद्रातील भाजपा सरकारच्या नेत्यांनी निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर अनेक आश्वासने दिली आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी करतो, हमीभाव देतो, तुरीच्या शेवटच्या कणापर्यंत खरेदी करतो ही त्यापैकीच काही आश्वासने आहेत. मात्र, ही आश्वासने पूर्ण होत नाहीत, पाळली जात नाहीत म्हणूनच आम्हाला संघर्ष यात्रा काढावी लागली आहे. महाराष्ट्रामध्ये भाजपा सरकारच्या कालावधीत सुमारे नऊ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असून, शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नाकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही. मात्र, आम्ही सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला भाग पाडू.’ अजित पवार म्हणाले, ‘राजकारण करण्यासाठी नव्हे, तर अडचणीतील शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी ही संघर्ष यात्रा काढली आहे. त्यामुळे विरोधकांनी किती जरी आरोप केले तरी त्या आरोपांना जनता थारा देणार नाही.’ (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलवा
By admin | Updated: April 28, 2017 03:20 IST