शिर्डी : शिवसेनेची सध्या सुरू असलेली झुंडशाही त्यांच्या अस्तित्वाच्या लढाईचा एक भाग असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.बीसीसीआय आणि पीसीबीच्या बैठकीवर शिवसेनेने हल्ला केल्याच्या घटनेसंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, मुळात शिवसेनेच्या पाकिस्तान विरोधावरच प्रश्नचिन्ह लागले आहे. शिवसेना मोदी सरकारमध्ये सहभागी असलेला एक प्रमुख राजकीय पक्ष आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या क्रिकेट संघाने भारताचा दौरा करू नये, अशी त्यांची भूमिका असेल तर त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधानांवर दबाव आणून हा संभाव्य दौरा रद्द करायला हवा होता. परंतु सरकारमध्ये सहभागी असलेला पक्ष कायदा हातात घेणार असेल तर ते समर्थनीय असू शकत नाही.सेनेच्या मंत्र्यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीत शपथ घेतली होती. शिवसेना राष्ट्रवादी असेल तर त्यांनी सरकारमधून बाहेर पडायला हवे. त्यानंतरच भाजपावर टीका करायला हवी, असे विखे पाटील म्हणाले. (प्रतिनिधी)
अस्तित्वाच्या लढाईसाठी सेनेची झुंडशाही
By admin | Updated: October 20, 2015 00:13 IST