मुंबई : आयआयटी मुंबईने केंद्र सरकार आणि सर दोराबजी टाटा ट्रस्ट यांच्या सहयोगाने विद्यार्थ्यांपर्यंत सौरदिवे पोहोचविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि ओडिशा या राज्यांत दहा लाख सौरदिवे वितरित केले आहेत.विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता संपूर्ण देशभरात या प्रकल्पाचा विस्तार करण्याचा मानस असून याविषयी केंद्रीय ऊर्जा, कोळसा व नवीनीकरण विभागाकडे आयआयटी मुंबईने प्रस्ताव पाठविला आहे. सध्या हा प्रकल्प चार राज्यांतील २३ जिल्हे, ९७ विभाग आणि १० हजार ९०० हून अधिक गावांमध्ये राबविला जात आहे. शिवाय, याची ५४ वितरण केंद्रे असून १ हजार ४०९ प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचे बळ असलेले ३५० दुरुस्ती केंद्रे आहेत. ‘द मिलिअन सोलार लॅम्प’ प्रकल्पाचे नेतृत्व आयआयटी मुंबईच्या ऊर्जा विभाग आणि अभियांत्रिकी विभागाचे प्रा. चेतन सिंग, सेंटर फॉर टेक्नोलॉजी अल्टरनेटिव्ह इन रुरल एरिआचे प्रा. एन.सी. नारायणन आणि इंडस्ट्रीअल इंजिनीअरिंग आॅपरेशन रिसर्चचे प्रा.जे. व्यंकटेश्वरन यांच्या सहभागातून प्रत्यक्षात साकारला आहे. या सोलार लॅम्पची मूळ संकल्पना आणि मॉडेल प्राध्यापकांनी बनविले आहे.ग्रामीण भागात कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी अशा प्रकारे प्रकल्पाची आखणी केल्याचे या प्राध्यापकांनी सांगितले. (प्रतिनिधी)
‘सौरदिव्यां’नी उजळतेय विद्यार्थ्यांचे भवितव्य!
By admin | Updated: July 2, 2016 02:50 IST