दप्तर होणार हलके!मुंबई : शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत शिक्षण विभागाने आदेश जारी केला असून, पहिल्या वर्गातील मुलांच्या दप्तराचे वजन २ किलो तर आठव्या वर्गातील मुलांच्या दप्तराचे वजन ४.२ किलोग्रॅमपेक्षा अधिक असू नये, असे आदेशात म्हटले आहे. दप्तराचे वजन या मर्यादेत राहील हे पाहणे ही जबाबदारी मुख्याध्यापकांवर सोपवली आहे.राज्य सरकारने दप्तराचे वजन कमी करण्याकरिता शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती. त्यांनी केलेल्या पाहणीत विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे वजन हे विद्यार्थ्यांच्या वजनाच्या २० ते ३० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे आढळून आले. शहरी भागातील मुलांच्या दप्तराचे वजन हे ग्रामीण भागातील मुलांच्या दप्तराच्या वजनापेक्षा अधिक असल्याचे आढळून आले. दप्तराचे वजन हे विद्यार्थ्यांच्या वजनाच्या १० टक्क्यांपेक्षा अधिक असू नये, असा निर्णय सरकारने घेतला आहे. पहिल्या वर्गातील मुलांचे सर्वसाधारण वजन २० किलो, तर आठव्या वर्गातील मुलांचे सर्वसाधारण वजन ४२ किलो असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वजनाच्या १० टक्के यानुसार पहिल्या वर्गातील मुलांचे दप्तर २ किलो, तर आठव्या वर्गातील मुलांचे दप्तर ४.२ किलोग्रॅमपेक्षा अधिक असू नये, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.शिक्षण विभागाने सर्व बोर्डाद्वारे निश्चित केलेली पुस्तके ई-पुस्तके स्वरूपात उपलब्ध राहतील याची काळजी शासन घेईल, असे स्पष्ट केले आहे. मात्र ही पुस्तके विद्यार्थ्यांना टॅबमध्ये दिली जातील, असे नमूद केलेले नाही. शिवसेनेची ही योजना शिक्षण विभागाने स्वीकारावी, अशी मागणी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी अलीकडेच केली होती.शाळेने घ्यायची काळजीदप्तराचे वजन विद्यार्थ्यांच्या वजनाच्या १० टक्के राहील ही मुख्याध्यापकांची जबाबदारी.पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त पुस्तके शाळेत आणण्यावर बंदी लागू करावी.ऱ्गहपाठ तपासण्याकरिता विषयनिहाय दिवस निश्चित करावा. एकाच दिवशी अनेक विषयांचे गृहपाठ तपासणीस ठेवू नयेत. द्वितीय सत्रासाठीच्या वह्या स्वतंत्र ठेवाव्यात. जोडविषयांसाठी एकच वही वापरावी.कार्यानुभव, चित्रकला, संगणक, शारीरिक शिक्षण, बालवीर व वीरबाला आदी विषयांच्या वह्या शाळेत ठेवाव्यात.शाळांनी मागील वर्षीची न फाटलेली पुस्तके जमा केली आहेत. ती शाळेत वापरावी व यावर्षी दिलेली पुस्तके घरी वापरावी.शाळेत ग्रंथालयासारखे ‘दप्तरालय’ सुरू करावे. यात इयत्तानिहाय आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य विद्यार्थीनिहाय उपलब्ध करावे. याकरिता कपाट, हँगर्स अथवा रॅकची व्यवस्था करावी व याकरिता लोकसहभाग घ्यावा. शाळेत ई-लर्निंगचा वापर वाढवावा.वेळापत्रकात जोडतासिका ठेवाव्यात व दररोज ३ ते ४ विषय वेळापत्रकात असावे. सध्या ३० ते ३५ मिनिटांची तासिका असते ती वाढवावी. मात्र एका तासापेक्षा अधिक काळ असू नये.शाळेत शुद्ध व स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे.पालकांना सूचना ई-मेल, संकेतस्थळ, व्हॉट्सअॅप अथवा शाळेतील सूचना फलकावर द्याव्या.एखाद्या विद्यार्थ्याच्या दप्तराचे वजन अधिक असल्यास मुख्याध्यापकांनी शाळेत त्याचे वजन करून पाहावे. वजन जास्त असल्यास शाळेचे नियोजन तपासून दुरुस्त करावे अथवा पालकांना सूचना द्यावी. दप्तराचे वजन वयोमानानुसार किमान २ किलो ते कमाल ४.२ किलोग्रॅमपेक्षा अधिक होणार नाही हे पाहावे.वजन आणखी कमी करण्याकरिता मुख्याध्यापकांशी चर्चा करून वेळापत्रकात बदल करवून घ्यावे.खाऊचा डबा व पिण्याच्या पाण्याची बाटली दप्तरात देऊ नये. (ग्राफिक्स ५ वर)(विशेष प्रतिनिधी)
दप्तर होणार हलके!
By admin | Updated: July 23, 2015 02:40 IST