नवी मुंबई : वाडा येथील अंबाडी नदीत तिघे जण वाहून गेल्याची घटना रविवारी दुपारी घडली होती. त्या तिघांचे मृतदेह तब्बल तीन दिवसांनी वसईतील खानावडे खाडीकिनारी आढळून आले आहेत. ऐरोली गावातील दहा जण रविवारी गटारीच्या दिवशी वाडा येथील अंबाडी नदीकिनारी सहलीसाठी गेले होते. या वेळी त्यापैकी काही जण नदीमध्ये पोहण्याचा आनंद लुटत असतानाच, पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे तिघे जण वाहून गेले होते. बबन मढवी, देविदास पाटील व विलास जोशी अशी त्यांची नावे आहेत. सर्व जण ४० ते ४५ वयोगटातले आहेत. त्यापैकी देविदास हे एनएमएमटीचे वाहक, बबन हे व्यावसायिक तर विलास हे उद्योजक होते. त्यांचा शोध घेण्यासाठी ऐरोलीकरांसह स्थानिक पोलीस व आपत्कालीन यंत्रणेचे तीन दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. या दरम्यान हेलिकॉप्टरचादेखील वापर झाल्याचे समजते. त्यांना शोधण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले जात होते. अखेर मंगळवारी तिघांचेही मृतदेह वसईत खानावडे खाडीकिनारी आढळून आले. ते तिघेही बालमित्र होते. वसईतील रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर रात्री तिघांचेही मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. (प्रतिनिधी)
वाहून गेलेल्या तिघांचे मृतदेह सापडले
By admin | Updated: August 3, 2016 05:30 IST