मुंबई : येत्या दोन महिन्यांत असंघटित कामगारांच्या कल्याणासाठी एक ठोस असे धोरण तयार करण्यात येईल आणि मंडळदेखील स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. राज्यातील असंघिटत क्षेत्रातील कामगारांसाठी एकच कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची मागणी शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी लक्षवेधीद्वारे केली. या कामगारांमध्ये यंत्रमाग कामगार, शेतमजूर, पत्रकार व वृत्तपत्रविक्रेते, रिक्षाचालक, ट्रकचालक, वाहनचालक यांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. असंघटित कामगारांच्या कल्याणासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध असूनही त्यांच्या कल्याणाच्या योजना परिणामकारकपणे राबविल्या जात नाहीत; मात्र, निश्चित असे धोरण आणि कल्याण मंडळ स्थापन झाल्यानंतर ते राबविण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंंत्र्यांनी दिली. या वेळी शिवसेना आमदार चंद्रदीप नरके, प्रकाश अबिटकर यांनीही याबाबत सरकार कोणते ठोस धोरण आखणार, असा प्रश्न उपस्थित केला. (विशेष प्रतिनिधी)
असंघटित कामगारांसाठी मंडळ दोन महिन्यांत
By admin | Updated: March 31, 2017 01:28 IST