राजकुमार जोंधळे,
लातूर- अंध असलेल्या घारापुरकर गुरुजींच्या ‘डोळस’ व्यवसायाने स्वाभिमानाचे जगणे त्यांच्या ओंजळीत टाकले आहे. जन्मत:च अंध असलेल्या गुरुजींनी आपल्या अंध बांधवांना शिक्षणाचे धडे देत त्यांच्यातही स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा पेरली आहे. नांदेड जिल्ह्यातील घारापूर (ता. हिमायतनगर) येथील सुधाकर सदाशिवराव घारापूरकर गुरुजींनी नोकरीनिमित्त १९७१मध्ये आपले गाव सोडले आणि कोकणातील मालवणमध्ये शिक्षकी पेशा स्वीकारला. त्यानंतर १९७४ साली लातुरात बदली झाल्यानंतर त्यांचा लेबर कॉलनीत मुक्काम झाला. तेव्हापासून ते लातुरात वास्तव्यास आहेत. अंधांना प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभा करण्यासाठी २ आॅक्टोबर १९८७ साली अंधजन विकास मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. आज या मंडळामार्फत ३० पेक्षा अधिक मुलांना रोजगार आणि निवासाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथील श्रीकृष्ण नगरात प्रिटींग, द्रोण-पत्रावळी, छोट्या प्लेट, वायरच्या खुर्चा, फाईल्स तयार करणे, स्क्रिन प्रिटींग, बुकबायडिंग आदीं व्यवसाय येथे सुरु आहेत. मंडळाच्यावतीने यासाठी कच्चा माल पुरवठा केला जातो. तयार मालाला लातूर, परभणीची बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात आली आहे.>डोळसांना लाजवेल अशी कामगिरी...गेल्या आठ वर्षापासून सुधाकर घारापूरकर गुरुजींनी पेपरपासून द्रोण, पत्रावळी, केळीचे पान, थर्माकोलपासून नाश्त्याच्या डिश बनविण्याचा उद्योग थाटला आहे. आजही ते दररोज या मशिनवर हे साहित्य तयार करण्याचे काम नेटाने करतात.