मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपाठोपाठ राज्यात झालेल्या छावणी परिषदेच्या (कॅन्टोन्मेंट बोर्ड) निवडणुकीत भाजपाने वर्चस्व कायम राखले आहे. राज्यातील ७ पैकी कामठी (नागपूर), पुणे जिल्ह्यातील पुणे व देहू रोड, नाशिकमधील देवळाली अशा ४ बोर्डात भाजपाने बाजी मारली. तर काँग्रेसने खडकीतील (पुणे) सत्ता कायम राखली. औरंगाबादमध्ये कोणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नाही. मात्र सातपैकी तीन जागांवर अपक्ष विजयी झाले. शिवसेना-भाजपाने प्रत्येकी दोन जागांवर बाजी मारली. त्यामुळे येथे त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. बहुमतासाठी चार जागांची गरज आहे. अहमदनगरच्या भिंगार बोर्डात शिवसेना व राष्ट्रवादीने प्रत्येकी तीन जागांवर विजय मिळविला. भाजपाला एक जागा मिळाली. भाजपाने शिवसेनेला साथ दिल्यास भिंगारमध्ये युतीची सत्ता स्थापन होईल. पुण्यात शिवसेनेला खातेही उघडता आले नाही. नागपूरमध्ये भाजपा समर्थित गटाने निवडणूक लढविली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)
कॅन्टोन्मेंट निवडणुकीत भाजपाची बाजी
By admin | Updated: January 13, 2015 03:07 IST