प्रताप नलावडे, बीड - लग्नसराईची सध्या धामधूम सुरू असतानाच बीड जिल्ह्यात मात्र अल्पवयीन मुलींचे बाहुल्यावर चढण्याचे प्रमाण खूप मोठे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. २० दिवसांत जिल्ह्यातील चार बालविवाह रोखले असून, गेल्या दीड वर्षात चाईल्ड लाईनने अशा प्रकारे ४२ अल्पवयीन विवाह रोखले आहेत. अल्पवयीन मुलींचा विवाह होत असल्याची तक्रार आल्यानंतर चाईल्ड लाइनच्या वतीने तो विवाह रोखण्यासाठी प्रयत्न केला जात असला तरी गुपचूप असे विवाह करण्याचे प्रमाण जिल्ह्यात खूप मोठे असल्याचे चाईल्ड लाइनचे तत्त्वशील कांबळे सांगतात. बीड जिल्हा हा ऊसतोडणी कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या ऊसतोडणी कामगारांमध्ये असे अल्पवयीन मुलींचा विवाह करण्याचे प्रमाण जास्त आहे. पती-पत्नी असतील तर ऊसतोडणी कामगारांना मुकदमाकडून उचल म्हणून मिळणारी रक्कम जास्त मिळत असल्याने आपल्या मुलाचे लग्न झटपट उरकण्याकडे त्यांचा कल असतो. अनेकदा मुलगा आणि मुलगी असे दोघेही अल्पवयीनच असतात.
बीडमध्ये अल्पवयीन मुली बोहल्यावर!
By admin | Updated: May 26, 2014 02:53 IST