राजीव मुळ्ये - सातारा --१९५९ मध्ये कोयना धरणामुळं संपूर्ण गाव उठलं. पण ‘तो’ तिथंच राहिला. चार वर्षांपूर्वी त्याच्याकडे २५० गुरं होती, ती आता चारवर आलीत. वयाच्या ८२ व्या वर्षी दम्याने त्रस्त पत्नीला जगवताना पोटाला चिमटा बसतोय; पण हट्ट कायम... मरेन तर इथंच! वन्यजीवांच्या सान्निध्यात राहण्याची सवय जडलेल्या या ‘जंगलमॅन’ची मुळं जुन्या झाडासारखी मातीत घट्ट रुतून बसलीत. असा म्हातारा सोमवारी अचानक ‘व्हीआयपी’ ठरला...कोयनेत भटकंती करणाऱ्या पर्यावरणप्रेमींना एवढं वर्णन सांगितलं, तरी ते छातीठोकपणे सांगतील, ‘हे तर आमचे शामराव कोकरे!’ डोक्याला भगवं मुंडासं, भगवा शर्ट आणि तशीच लुंगी नेसून शामरावांची स्वारी सोमवारी सातारच्या रस्त्यावर दिसली तेव्हा निसर्गप्रेमींनी त्यांना अक्षरश: ‘उचललं’. कोयनेतल्या निसर्गाइतकाच शामरावांचा लळा लागलेला. फोनाफोनी झाली. अगदी कोल्हापूरहूनही एक मित्र ‘गाडी घेऊन येतो,’ म्हणू लागला... पण... जिन्यावरून उतरताना जेव्हा शामरावांना चक्कर आली, तेव्हा कळलं ते तीन दिवस उपाशी आहेत! खिशात चिपळूणच्या कुठल्याशा डॉक्टरनं दिलेली चिठ्ठी घेऊन भणंग अवस्थेत साताऱ्यात फिरणाऱ्या या माणसाचं मोतिबिंदूचं आॅपरेशन करावं लागणार आहे. झालं! लगेच चक्रं फिरली. निसर्गात रमणारे डॉ. मिलिंद भाकरे यांनी शामरावांना घेऊन तडक क्लिनिकमध्ये बोलावलं. तपासणी केली. रक्ताची चाचणी करायला सांगितलं. लॅबमध्ये फोन केला. मंगळवारी आॅपरेशन करायचं ठरलंसुद्धा! चार दिवस आराम करून, या निसर्गमित्रांचा पाहूणचार घेऊनच शामराव आता परततील. हा कफल्लक म्हातारा एकाएकी असा ‘व्हीआयपी’ कसा काय ठरला..? एका हाकेवर हे इतके ‘नातेवाईक’ जमले कुठून? अर्थातच निसर्ग हाच सर्वांना शामरावांशी बांधणारा एकमेव समान धागा.कोयनेतलं मालदेव गाव रिकामं झाल्यानंतरही भुतासारखं एकटं जगणाऱ्या शामरावांना जाईल तिथं असे मित्र भेटतात. ‘शरीर धडधाकट असेपर्यंत हात पसरायचा नाही,’ असा बाणा असला, तरी देणारे हात कोपऱ्याकोपऱ्यावर त्यांची जणू वाट पाहतात. असं का? दोन दिवसांपूर्वी रात्री केलेली भाताची पेज बायकोसाठी ठेवून ते उपाशी झोपले. सकाळी उठून पायवाटेनं तिवऱ्याला. तिथून चिपळूणला. तिथून एसटीनं सातारा स्टँडवर रविवारी रात्री दीडला ते उतरले. सकाळपासून उन्हातानात फिरताना ‘मित्रा’च्या दृष्टीस पडले आणि ‘सेलिब्रिटी’च झाले. हे का घडलं?कोयनेच्या जंगलात भटकंती करणाऱ्या प्रत्येकाला मालदेवचे शामराव पितृतुल्य. जंगली श्वापदांची शास्त्रीय माहिती पुस्तकात ठेवून शामरावांशी गप्पा माराव्यात आणि खरं जंगल जाणावं, हा अनेकांचा शिरस्ता बनलाय. श्वापदांनी एखादं करडू मारलं, तरी बोटं मोडणारे अनेकजण भेटतील; पण ज्यांचा २५० जनावरांचा गोठा रिता झाला, त्या शामरावांनी वन्यजीवांना कधीच शिव्याशाप दिले नाहीत. आता तर घरात किडूकमिडूकच शिल्लक. तरी बाणा तोच. जंगलातला माणूस मरेल तर जंगलातच! पण ही ‘साधना’ वाया गेली नाही, हे सोमवारी पुन्हा सिद्ध झालं. सातारच्या जंगलप्रेमींनी या म्हाताऱ्याला एकटं सोडलं नाही... ते कधीच एकटे पडणारही नाहीत! खानार असचिन त मना मार!शामरावांची असंख्य गुरं बिबटे, अस्वलं, वाघांनी डोळ्यासमोर ओढून नेली, तरी ते डगमगले नाहीत. मनातल्या मनात वाघोबाला म्हणतात, ‘खानार असचिन त मना मार.’ जंगलातून, गावातून बाहेर पडत नाही म्हणून आपल्यावर खोटी केस लावली गेली; पण आपण खरे होतो म्हणून निर्दोष सुटलो, असं ते सांगतात. त्यांची बायको सतत ‘शहरात चला’ म्हणत असते. बारा मुलं झाली. त्यातली तीन गेली. नऊ जणांना शामरावांनी शिकवलं आणि बाहेर पाठवलं. कारण हा निवारा कायमचा नाही, हे त्यांना ठाऊक होतं. स्वत: मात्र जंगलातच राहिले. मुलं आधी जाऊन-येऊन असायची. आता संसारात रमली. शामरावांची कुणाबद्दल तक्रारच नाही; कारण निसर्गमित्र पावलोपावली भेटतातच. त्यांनी पुनर्वसन कबूल केलं नाही. पॅकेज नाकारलं. संघर्ष करून पाच एकर जमीन मिळवली. आता पोरांना त्या मोबदल्यात अभयारण्याबाहेर जमीन मिळावी, यासाठी ते संघर्ष करतायत.
भणंग म्हातारा जेव्हा ‘व्हीआयपी’ बनतो...
By admin | Updated: March 31, 2015 00:20 IST