राज्यपाल के. शंकरनारायणन यांचे मत : रायन इंटरनॅशनल स्कूलचे उद्घाटनपुणे : आपला देश महासत्ता बनण्याकडे वाटचाल करीत आहे. यामध्ये शिक्षणाची भूमिका महत्वाची आहे. आजही तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचलेले नाही. गरीब लोक, आदिवासी, जाती-जमाती शिक्षणापासून वंचित आहे. जोपर्यंत शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत भारत खर्याअर्थाने महासत्ता होणार नाही, असे मत राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी व्यक्त केले.रेयान इंटरनॅशनल स्कूलच्या उद्घाटन कार्यक्रम ते बोलत होते. याप्रसंगी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, प्रसिध्द अभिनेता जॉनी लिव्हर, रेयान इंटरनॅशनल ग्रुपचे अध्यक्ष डॉ. ए. एफ. पिन्टो व्यासपीठावर उपस्थित होते. खासदार संजय काकडे, उषा काकडे, ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालिका ग्रेस पिन्टो, मुख्य कार्यकारी अधिकारी रेयान पिन्टो कार्यक्रमास उपस्थित होते. राज्यपाल म्हणाले, भारत महासत्ता बानण्याच्या मार्गावर आहे. आजची मुले हिच देशाचे उद्याचे भविष्य असणार आहे आणि तेच वेगवेगळया क्षेत्रात देशाचे नेतृत्व करणार आहे. हे साध्य करण्यासाठी आपली शिक्षण पध्दतीत बदल करून नवकल्पनांना वाव दिला पाहिजे आणि सर्वसमावेशक शिक्षण पध्दती अवलंबली पाहिजे. पूर्ण जग आता एक कुटुंब होत आहे. अशात आपल्या मुलाला चांगला नागरिक बनविण्याची जबाबदारी आई-वडील व शिक्षकांवर आहे. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांचे चारित्र्य घडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. माहिती, ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचविण्यात माहिती तंत्रज्ञान, आयसीटी हे आजच्या काळात महत्वाची भूमिका बजावत आहे. त्याचा वापर शाळांनी केला पाहिजे. पुणे हे एक महत्वाचे शहर असून त्याला एक ऐतिहासिक परंपरा आहे. ऑस्क्सफर्ड ऑफ द ईस्ट अशी ओळख असलेल्या पुणे विद्यापीठात २० हजाराहून अधिक परदेशी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, ही गौरवाची बाब आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.डॉ. पिन्टो यांनी मनोगत व्यक्त केले.
महासत्ता बनण्यासाठी शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचायला हवे
By admin | Updated: June 2, 2014 22:59 IST