लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर होत असलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून काँग्रेसने माघार घ्यावी यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी यश आले. मात्र, इतर २३ उमेदवार रिंगणात असल्याने २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी फोनवरून चर्चा केली. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या (अजित पवार) उमेदवार सुनेत्रा पवार यांनीही काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी फोनवर संवाद साधला. तर दुसरीकडे अजित पवार गटाचे शिष्टमंडळही सपकाळ यांना भेटले. आ. रोहित पवार, सुप्रिया सुळे यांनीही सपकाळांना फोन केला होता. सपकाळ यांनी त्यानंतर काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांशी चर्चा केली आणि पत्रकार परिषद घेत उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर अॅड. आकाश मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
रोहित पवार यांनी सपकाळांची भेट घेतली त्यावेळी सपकाळ यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याशी त्यांचे व्हिडीओ कॉलवर बोलणे करून दिले. त्यानंतर रोहित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना काँग्रेस पक्षाबद्दल पार्थ पवार यांनी केलेल्या विधानाबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.
शरद पवारांचीही विनंती
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना फोन करून काँग्रेसने उमेदवारी माघारी घ्यावी, अशी विनंती केली. बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली, ती अपघाताने. यात एक कर्तृत्ववान व्यक्ती गेला. त्यामुळे मी काँग्रेसला सल्ला देईन, की या घटनेच्या पार्श्वभूमीवर बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करणे योग्य होईल. हा निर्णय काँग्रेसला घ्यायचा आहे, असे शरद पवार यांनी काँग्रेसने माघारीचा निर्णय घेण्यापूर्वी पत्रकारांना सांगितले.
उमेदवारी मागे घेतली पण...
बारामतीची पोटनिवडणूक लढली पाहिजे, अशी काँग्रेस पक्षाची भूमिका होती. काँग्रेसचे हे वैचारिक पाऊल योग्यच आहे. पण, याबरोबर महाराष्ट्राची संस्कृती, समंजसपणा, सभ्यता याची एक किनारही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटातील नेत्यांनी संवाद साधून उमेदवारी माघारी घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांशी व पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून बारामतीतून काँग्रेसची उमेदवारी माघारी घेत आहोत. आज दोन पावले मागे येऊन माघार घेतली असली तरी २०२९ च्या निवडणुकीत बारामतीतून काँग्रेसचा आमदार असेल.-हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
Web Summary : Congress withdrew from the Baramati by-election after requests from Fadnavis, Sharad Pawar, and Sunetra Pawar. Despite the withdrawal, 23 candidates remain, and voting will proceed on April 23rd. Congress aims for MLA in 2029.
Web Summary : फडणवीस, शरद पवार और सुनेत्रा पवार के अनुरोध के बाद कांग्रेस बारामती उपचुनाव से हट गई। वापसी के बावजूद, 23 उम्मीदवार मैदान में हैं और 23 अप्रैल को मतदान होगा। कांग्रेस का लक्ष्य 2029 में विधायक बनना है।