ऑनलाइन लोकमत
मुंबई,दि. ३१ - महाराष्ट्रातल्या सगळ्या म्हणजे २.३० लाख विनाघर आदिवासींना व सगळ्या मागासवर्गीयांना घर मिळेल अशी योजना आखल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.
जवळपास २.३० लाक आदिवासींना हक्काचं घर नसून दरवर्षी २५ हजार आदिवासींना विनाअट घरं देणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. केंद्र सरकारने २०२२ पर्यंत प्रत्येक भारतीयाला स्वत:च हक्काचं घर असेल असं उद्दिष्ट्य ठेवलं आहे, त्या उद्दिष्ट्याचा उल्लेख करत त्या दिशेनेच राज्य सरकार काम करत असल्याचं फडणवीस म्हणाले.
याखेरीज राज्यातल्या सगळ्या मागासवर्गीयांना जमिनीसाठी व घरासाठी विनाअट पैसे देण्याची योजना आखल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. या योजनांना लवकरच मंत्रिमंडळाची मंजुरी मिळेल असे त्यांनी स्पष्ट केले.
आदिवासी महिलांमध्ये व मुलांमध्ये कुपोषणाची मोठी समस्या असल्याचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले आदिवासी समाजातील सगळ्या गरोदर महिलांना प्रसुतीच्या तीन महिने आधी व तीन महिने नंतर सकस आहार पुरवण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.