३७ जणांचा झाला होता मृत्यू : मावळ तालुक्यातील भाजे गावात कोसळली होती दरडभाऊ हुलावळे ल्ल कार्ला (ता. मावळ)आंबेगाव तालुक्यातील माळीण या गावात ४० घरांवर दरड कोसळल्याची बातमी ऐकली आणि मावळ तालुक्यातील मळवलीनजीकच्या भाजे गावातील २५ वर्षांपूर्वीच्या भीषण घटनेच्या आठवणीने ग्रामस्थांचा पुन्हा एकदा थरकाप उडाला.मळवली रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावरील छोट्या, पण निसर्गरम्य भाजे गावाचे पर्यटन नकाशावर बुद्ध लेण्यांमुळे ठळक स्थान आहे. याच गावात २३ जुलै १९८९ रोजी असाच निर्सगाचा कोप झाला होता. लेणीच्या अलीकडे असलेल्या टुमदार भाजे गावात झालेल्या जोरदार पावसामुळे सकाळी पावणेसातच्या सुमारास टेकडीचा भाग खचला आणि दगडमातीच्या लोंढ्याने लगतची अनेक घरे आपल्या उदरात घेतली. त्यातील एकूण ३७ जण यात मृत्युमुखी पडले. राऊत कुटुंबातील तब्बल २६ माणसे एकाच वेळी काळाने हिरावून नेली. टेकडीपासून दूर असलेली गावातील इतर घरे बचावलीया घटनेत बचावलेले राऊत कुटुंबातील संदीप राऊत यांना मुसळधार पावसातील घडलेले मृत्यूचे तांडव आठवताना अश्रू आवरत नव्हते. त्या वेळी ते नुकतीच बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले होते. ते म्हणाले, ‘‘आमचे कुटुंबच उद्ध्वस्त झाले. माझे आई-वडील, भाऊ, तीन चुलत भाऊ, त्यांची बायका-मुले, चुलते, चुलती, दोन चुलत बहिणी, त्यांची मुले अशी २६ माणसे एकाच वेळी मातीत गाडली गेली. मला एका व्यक्तीने आवाज दिल्याने सुदैवाने वाचलो. एक चुलतभाऊ कामानिमित्त बाहेर गेला होता. तोही वाचला. मी वाचलो, पण पुढे काय झाले हे फारसे आठवत नाही.या घटनेचे साक्षीदार माजी सरपंच नंदू पदमुले यांनी सांगितले, की राऊत, टकले, खाटपे, बारमुख या कुटुंबावर त्या दिवशी काळाने घाला घातला. त्या घरांतील कामानिमित्त बाहेर गेलेलेच बचावले. अनेक जनावरेही ढिगाऱ्याखाली गाडली गेली. ही घटना घडण्याच्या आदल्या रात्रीपासून धोधो पाऊस सुरू होता. सकाळीच घटना घडल्याने आम्ही सुन्न झालो. कान्हे येथील मोरी वाहून गेल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. दूरध्वनी यंत्रणा बंद होती. मी स्वत: भाजे ते लोणावळा असा चालत जाऊन लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यास दुर्घटनेची खबर दिली. त्या नंतर प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली. सुदैवाने कार्ल्याजवळ इंद्रायणी नदीवरील नवीन पुलाचे काम पूर्ण होऊन तो वाहतुकीस खुला झाला होता. त्यामुळे ढिगारा बाजूला करण्यासाठीची यंत्रसामग्री घटनास्थळी नेता आली. मदतकार्य कित्येक दिवस सुरू होते. त्या वेळेच्या आठवणींनी आजही थरकाप उडतो.> भाजे लेणीकडे जाणारा रस्ता त्या वेळी पूर्णपणे ढिगाऱ्याखाली गेला होता. तत्कालीन महसूल राज्यमंत्री मदन बाफना तालुक्यातीलच असल्याने शासकीय यंत्रणा वेगाने हलत होती. आपद्ग्रस्त १०५ कुटुंबांचे पुनर्वसन प्रत्येकी दीड गुंठा जागा देऊन गावानजीकच्याच सुरक्षित जागेवर करण्यात आले. मृत व्यक्तींच्या वारसांना १५ हजार रुपये देण्यात आले.
अन् २५ वर्षांपूर्वीच्या आठवणीने पुन्हा उडाला थरकाप!
By admin | Updated: July 31, 2014 11:02 IST