लवकरच होणार रुजू : परीक्षा मंडळाचा अहवाल कुलपतींकडे सादरअमरावती : आपल्या कन्येच्या गुणवाढ प्रकरणात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु मोहन खेडकर यांच्यावर ठेवण्यात आलेल्या आरोपातून परीक्षा मंडळाने त्यांना निर्दोष ठरविले आहे. हा निर्णय बहुमताने परीक्षा मडंळाच्या सभेत पारित झाला असून राजभवनाकडे मंजुरीकरिता पाठविण्यात आला आहे. त्यामुळे मोहन खेडकर हे लवकरच सक्तीच्या रजेवरून परत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.गेल्या काही सहा महिन्यांपासून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु मोहन खेडकर यांच्यावर याप्रकरणी आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. खेडकर यांची कन्या मृणाल हिने पेपर पुनर्मूल्यांकनाचेवेळी गुणवाढ केली व त्यासाठी कुलगुरुंनी तिला सहकार्य केले, असा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता. याकरिता अनेक सामाजिक संघटनांनी कुलगुरु चले जावचे नारे देत तीव्र आंदोलन केले. त्यामुळे याप्रकरणाची चौकशी करण्याकरिता सिनेट सभेने चौकशी समिती गठित केली होती. तसेच परीक्षा गैरव्यवहार चौकशी समिती ३२(६) बसविण्यात आली होती. मागील सिनेट सभेत चौकशी समितीने कुलगुरुविरोधात अहवाल सादर केला होता; मात्र तो फेटाळण्यात आला. त्यानंतर ३२(६) कमिटीच्या अहवालाची सर्वांंना प्रतीक्षा होती. ३२(६) कमिटीचे अध्यक्ष संतोष ठाकरे यांनी हा अहवाल नुकताच सादर केला. त्यामध्ये तीन सदस्य कुलगुरु मोहन खेडकर यांच्या बाजूने तर दोन सदस्य त्यांच्या विरोधात होते. या अहवालाला शुक्रवारी परीक्षा मडंळाच्या सभेत ठेवण्यात आले होते. मात्र त्यात अहवालाच्या बाजूने सहा तर विरोधात चार सदस्यांनी आपले बयाण नोंदविल्याने कुलगुरु निर्दोष असल्याचा प्रस्ताव सभेत पारित करण्यात आला. हा प्रस्ताव कुलपतींकडे पाठविण्यात आला असून कुलगुरु मोहन खेडकर यांना रुजू करण्याचा निर्णय राजभवनातून लवकरच येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)
कन्येच्या गुणवाढ प्रकरणी अमरावतीचे कुलगुरू बचावले
By admin | Updated: June 8, 2014 00:57 IST