अमरावती : विभागातील ५४ तूरखरेदी केंद्रावरील गोंधळ कायम असल्याने मोजणीचा वेग मंदावलेला आहे. बुधवारपर्यंत या केंद्रांवर ३४ हजार ५३९ शेतकऱ्यांची ७ लाख ८१ हजार २६६ क्विंटल तूर मोजणी शिल्लक होती. त्यातच खरीप हंगाम महिन्यावर आल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहे.२२ एप्रिल रोजी सर्व तूरखरेदी केंद्रे बंद केल्यानंतर अमरावती विभागातील ५४ केंद्रांवर ३७ हजार ७६८ शेतकऱ्यांची ८ लाख ४२ हजार ५२६ क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत होती. शासनाने ही तूर खरेदी करण्याचा निर्णय २७ एप्रिल रोजी घेतला. मात्र, बारदाना, ग्रेडर व गोदाम उपलब्ध नसल्याने अनेक खरेदी केंद्रे बंदच होती. दोन दिवसांपासून बहुतांश केंद्रांवर खरेदी सुरू झाली असली, तरीही मोजणीचा वेग मंदावलेलाच आहे. शासनाने या केंद्रांवर पडताळणी व ग्रेडिंगसाठी समित्या नियुक्त केल्या आहेत. बुधवारपर्यंत शिल्लक तुरीपैकी तीन हजार २५९ शेतकऱ्यांची ६१ हजार २५९ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. (प्रतिनिधी)
अमरावती भागात ८ लाख क्विंटल तूर मोजणी बाकी
By admin | Updated: May 4, 2017 03:43 IST