अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी पदवी परीक्षेच्या उत्तरपत्रिका गहाळ झाल्याचे वृत्त असून, याप्रकरणी कृषी विद्यापीठाने कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. महेंद्र नागदेवे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या द्वितीय वर्षाच्या सूक्ष्म जीवशास्त्र व इतर विषयांच्या शंभर उत्तरपत्रिका गहाळ झाल्या आहेत; परंतु निकाल जोपर्यंत लागणार नाही तोपर्यंत या गुणपत्रिका नेमक्या कोणत्या केंद्रावरील होत्या, हे समजणे कृषी विद्यापीठाला कठीण झाले आहे. त्यामुळे आता निकालाची प्रतीक्षा सुरू आहे. याप्रकरणी कृषी विद्यापीठाने पोलीस तक्रार करू न पाठपुरावा करणे अपेक्षित होते; परंतु विद्यापीठ प्रशासन याबाबत गंभीर नसल्याचा आरोप होत आहे. गतवर्षी १00 उत्तरपत्रिका गहाळ झाल्या होत्या. नेमक्या याच विद्यापीठात उत्तरपत्रिका गहाळ कशा होतात, यामागे एखादे रॅकेट तर नाही, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. दरम्यान, डॉ. नागदेवे समिती एक-दोन दिवसात या प्रकरणी चौकशीला सुरुवात करणार असून, लवक रच आपला अहवाल कृषी विद्यापीठ प्रशासनाला सादर करणार आहे. उत्तरपत्रिका गहाळ झाल्या. त्याचा छडा लागणे कठीण आहे. निकाल लागल्यावरच कोणत्या उत्तरपत्रिका गहाळ झाल्या, हे कळेल. उत्तरपत्रिका न सापडल्यास विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घ्यावी लागणार असल्याचे विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी स्पष्ट केले.
कृषी विद्यापीठातून पदवी परीक्षेच्या उत्तरपत्रिका गहाळ !
By admin | Updated: September 2, 2015 02:13 IST