मुंबई : मुख्यमंत्रिपद स्वीकारण्याचा विचार आपण अद्याप केलेला नाही. महायुतीची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्रिपदाबाबत महायुतीतील नेत्यांशी चर्चा करू, असे स्पष्ट करत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेला स्वल्पविराम दिला.
चार महिन्यांनंतर होणा:या विधानसभा निवडणुकीत महायुतीचीच सत्ता येणार असे गृहीत धरून मुख्यमंत्री कोण असेल, भाजपाचा असेल की शिवसेनेचा यावरून वाद, चर्चा आणि दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. महायुतीमध्ये ज्या पक्षाचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री राहील किंवा अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद वाटून घेतले
जाऊ शकते, असे भाजपाचे नेते सांगत आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री व्हावेत, अशी शिवसैनिकांची इच्छा असल्याचे सांगत शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपाला अस्वस्थ केले आहे.
रंगशारदामध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेल्या शिवसेनेच्या शिबिरात उद्धव ठाकरे कुठली भूमिका घेतात याबाबत उत्सुकता होती. मात्र, मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारीवर कोणतेही भाष्य न करता त्यांनी पत्रकारांचे प्रश्न टोलवले. तुम्ही मुख्यमंत्री होण्यास इच्छुक आहात का, विधानसभा निवडणूक लढणार का, या प्रश्नांना बगल देत महायुतीचे नेते एकत्रितपणो निर्णय घेतील, असे सांगून ते म्हणाले, मी माध्यमांची घाई समजू शकतो; पण मला कसलीही घाई नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी आपण काय करू शकतो हा मुख्य अजेंडा असल्याचे ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)
स्वबळावर लढणार नाही
मी मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा शिवसैनिकांनी व्यक्त केलेली आहे. मी त्याबाबत अद्याप विचार केलेला नाही, असे सांगतानाच त्यांनी महायुती म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे सूचित केले. ते म्हणाले की, पक्ष वाढविण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण त्याचा अर्थ आम्ही स्वबळावर लढणार असा होत नाही.